राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अभिनेता रितेश देशमुख आणि त्यांची पत्नी जिनिलिया एका वेगळ्याच कारणामुळे सध्या चर्चेत आहेत. भारतीय जनता पार्टीने त्यांच्या कंपनीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. रितेश आणि जिनिलिया यांच्या देश अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसंदर्भात हा आरोप करण्यात आला आहे. या कंपनीला देशमुख कुटुंबाचं वर्चस्व असणाऱ्या बँकांकडून तातडीने कर्ज कसं मिळालं? अगदी महिन्याभराच्या कालावधीमध्ये एमआयडीसीमध्ये या कंपनीला जमीन कशी मंजूर करण्यात आली? १६ उद्योजकांना टाळून रितेश आणि जेनेलियाच्या कंपनीला प्राधान्य का देण्यात आलं? असे अनेक प्रश्न भाजपाने उपस्थित केले आहेत. दरम्यान आता याप्रकरणी देश अॅग्रो कंपनीकडून खुलासा करण्यात आला आहे.
आणखी वाचा : “मराठीपेक्षा हिंदी चित्रपट…” रितेश देशमुखचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खुलासा पत्रकात नेमकं काय?

लातूर येथील नियोजित देश अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड या संदर्भात वृत्तवाहिनीवरील वृत्त चुकीच्या माहितीवर आधारित आहे. देश अॅग्रोचे प्रवर्तक रितेश आणि जिनिलिया देशमुख यांच्याबाबत गैरसमज निर्माण होऊ नये, अशी विनंती या कंपनीचे आस्थापना व्यवस्थापक दिनेश केसरे यांनी केली आहे.

देश अॅग्रोसाठी भूखंड वाटप नियमानुसार

लातूर अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत देश अॅग्रो या कृषी प्रक्रिया आधारित उद्योगासाठी वाटप करण्यात आलेल्या भूखंडाबाबत अॅड. प्रदीप मोरे आणि गुरुनाथ मगे यांनी प्रसिद्धीपत्राच्याद्वारे घेतलेले आक्षेप वस्तुस्थितीवर आधारित नसल्याचा खुलासा देश अॅग्रोचे आस्थापना व्यवस्थापक दिनेश केसरे यांनी केला आहे.

लातूर परिसरातील शेतकऱ्यांना मदत व्हावी आणि येथे कृषी आधारित उद्यागोची वाढ व्हावी या उद्देशाने देश अॅग्रोची स्थापना करण्यात आली असून सोयाबीन प्रक्रिया आणि सोयाबीन आधारित विशेष उत्पादने या उद्योगामध्ये घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने अतिरिक्त लातूर औद्योगिक वसाहतीतील भूखंड या उद्योग घटकास रितसर आणि नियमानुसार लिजवर दिलेला आहे.

देश अॅग्रोचे प्रवर्तक रितेश आणि जिनिलिया देशमुख हे कायद्याचे आदर राखणारे आहेत. तसेच सामाजिक भान बाळगणारे असल्याची त्यांची ओळख आहे. या उद्योग घटकासाठी वित्तीय संस्थांनीही नियमानुसार कर्ज वितरित केले असल्याने संबंधितांचे आक्षेप वस्तुस्थितीला धरुन नाहीत. अॅड प्रदीप मोरे आणि गुरुनाथ मगे यांनी नव्याने उभारण्यात येणाऱ्या या कृषी आधारित उद्योगासाठी विरोधी भूमिका घेऊ नये अशी आमची त्यांना विनंती आहे, असेही केसरे यांनी या खुलाशात म्हटले आहे.

आणखी वाचा : १२० कोटींच्या कर्जामुळे रितेश-जेनेलिया अडचणीत? १६ उद्योजकांना डावलून देशमुखांच्या कंपनीला प्राधान्य दिल्याचा भाजपाचा आरोप

दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आहेत. माजी पालकमंत्री संभाजीराव निलंगेकर, औसाचे आमदार आणि फडणवीसांचे निकटवर्तीय अभिमन्यू पवार यांनी थेट आरोप केलेले नाहीत. मात्र, भाजपा पदाधिकाऱ्याने केलेल्या आरोपांमुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेत. हा भाग सोयाबीनच्या शेतीसाठी ओळखला जातो. त्यासाठी प्रोसेसिंग युनिट उभे केले जातात. हे युनिट उभे करताना कोणाला नियमांबाहेर जाऊन मदत करण्यात आली आहे का? असा प्रश्नही विचारला जात आहे. महिन्याच्या आत जागा मिळाली, महिन्याच्या आत कर्ज मिळालं, अशी तत्परता सहकार क्षेत्रातील या बँकेने किती जणांसाठी दाखवली आहे? देशमुखांच्या कार्यकर्त्यांव्यतिरिक्त कोणालाही कर्ज दिलं नाही, असं भाजपाने म्हटलं. यासंदर्भात सहकार मंत्र्यांकडे, उद्योग मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचंही सांगण्यात आलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish genelia deshmukh desh agro company first reaction on corruption allegations by bjp nrp