अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांत काम केले आहे. त्यांच्या अभिनयामुळे त्यांचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’, ‘आई’, ‘अथांग’, ‘परिवर्तन’, ‘घात प्रतिघात’, ‘मैत्री जीवाची’, ‘सून लाडकी सासरची’, ‘देवकी’, ‘दुर्गा म्हणत्यात मला’, अशा अनेक चित्रपटांतून मिलिंद गवळी यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. कधी नायक तर कधी खलनायकाच्या भूमिकेत ते दिसून आले. प्रत्येक भूमिकेतून त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली. सध्या ते ‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे मोठ्या चर्चेत आहेत. या मालिकेतील त्यांच्या सह कलाकाराने मिलिंद गवळी यांच्याविषयी केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
काय म्हणाला अभिनेता?
‘अल्ट्रा मराठी बझ’ या यूट्यूब चॅनेलने नुकताच ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकारांशी संवाद साधला. यावेळी मालिकेत अभिषेक देशमुखची भूमिका साकारणारा अभिनेता निरंजन कुलकर्णीने मिलिंद गवळी यांच्याविषयी बोलताना म्हटले, “सेटवर ते सगळ्यांची प्रचंड काळजी घेतात. प्रचंड प्रेमळ माणूस आहे. आजपर्यंत त्यांंना कधी चिडलेलं, रागावलेलं, ओरडलेलं पाहिलं नाही. त्यांना जर वाईट वाटलं, जर आपण काही चुकीचं करत असेल, कोणी व्यसन करत असेल, तर त्यांना ते आवडत नाही; ते त्याच्या विरोधात आहेत, त्यामुळे ते त्याच्या भल्यासाठीच ओरडत असतात. सगळ्यांना त्यांच्याबद्दल आदर आहे. आम्हालासुद्धा ते चार गोष्टी सांगतात. वेळेवर या, नीट खात जा, वेळेवर झोपत जा. म्हणजे ते वडिलांसारखे आहेत. आमच्या सेटवर प्रत्येकाची काळजी घेणारे आहेत. कोणाला त्यांचा राग येत नाही, ते प्रेमळच आहेत”, अशा भावनात मिलिंद गवळी यांच्याबद्दल आदर असल्याचे अभिनेत्याने म्हटले आहे.
‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे. या मालिकेत मिलिंद गवळी मुख्य भूमिकेत दिसले आहेत. त्यांनी अनिरुद्ध हे पात्र साकारले आहे. हे पात्र सकारात्मक नाही किंवा पूर्णत: नकारात्मक नाही. मोठी स्वप्ने बघणारा, आजच्या जगाच्या बरोबरीने चालणारा, कधी स्वार्थी वाटणारा, कधी मुलांसाठी हळवा वाटणारा, आईची काळजी घेणारा, अशी विविध रूपे अनिरुद्धची पाहायला मिळाली. या मालिकेतून मिलिंद गवळींचा वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला.
मिलिंद गवळी यांनी गेल्या काही दिवसांमध्ये मुलाखती, व्हिडीओ या माध्यमांतून मालिका, त्यांनी साकारलेली भूमिका, मालिकेचा सेट म्हणजेच समृद्धी घर याबद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या संपर्कात असतात. विविध शूटिंगच्या विविध गोष्टी सांगताना दिसतात.
हेही वाचा: भयंकर अपघातातून बचावलेल्या कश्मीरा शाहने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली, “आता नाकावर…”
दरम्यान, आता या मालिकेनंतर मिलिंद गवळी कोणत्या नवीन मालिका किंवा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd