‘गोरे रंग पे न इतना गुमान कर’ हे गाणं म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर एकच चेहरा येतो तो म्हणजे अभिनेत्री मुमताज यांचा. ६०- ७० च्या दशकात मुमताज यांनी अभिनय कौशल्य आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली होती. एकेकाळी अनेकांच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या या सुंदर अभिनेत्रीचे नाव अनेक सहकलाकारांशी जोडण्यात आले. संजय खान, फिरोज खान, देव आनंद आणि शम्मी कपूर या कलाकारांसोबत मुमताज यांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. पण, शम्मी कपूर यांच्यासोबतच्या बहुचर्चित रिलेशनशिपमुळे त्यांचे नाव चर्चेत राहिले. शम्मी कपूर यांनी मुमताज यांना लग्नाची मागणीही घातली होती. मात्र काही कारणामुळे मुमताज यांनी त्यांच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता मुमताज यांनी यावर भाष्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शम्मी कपूरवर माझे अफाट प्रेम

शम्मी कपूर यांनी तुम्हाला लग्नाची मागणी घातली होती. मात्र तुम्ही त्यांना स्पष्टपणे नकार दिला, यामागचे नेमकं कारण काय? असा प्रश्न मुमताज यांना विचारण्यात आला. यावेळी मुमताज म्हणाल्या, “त्या काळात सगळ्या जगाला माझ्याशी लग्न करायचे होते. पण मी कोणाबरोबर सुखी राहू शकते, हे ठरवण्याचा संपूर्ण अधिकार मला होता. शम्मी कपूर माझ्यावर खूप प्रेम करायचे. त्यांना माझी प्रचंड काळजी होती. शम्मी कपूर आणि मी एकेकाळी एकमेकांवर अफाट प्रेम करायचो यावर कोणाचा विश्वास बसणार नाही.” असे त्यांनी सांगितले.

मात्र जेव्हा मी शम्मीने दिलेली लग्नाची ऑफर नाकारली यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. त्यावेळी मी शम्मी कपूरसारख्या श्रीमंत माणसाला कसे नाकारु शकते? असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र आता जेव्हा मी मयून मधवानीसोबत सुखी वैवाहिक जीवन जगत आहे, तेव्हा मी शम्मी कपूरच्या लग्नाची ऑफर नाकारली, यावर लोक विश्वास ठेवतात. विशेष म्हणजे देवाच्या कृपेने मयूर माधवानींकडे सुद्धा भरपूर संपत्ती आहे, असेही त्या म्हणाल्या.

या’ कारणामुळे शम्मी आणि मुमताज यांच्या नात्याला पूर्णविराम 

शम्मी कपूर यांनी मुमताज यांना वयाच्या १८ वर्षी लग्नाची मागणी घातली होती. त्यावेळी मुमताजसुद्धा शम्मीजींच्या प्रेमात होत्या. पण, लग्नानंतर चित्रपटसृष्टीतील करिअर सोडून मुमताज यांनी कुटुंबाला प्राधान्य द्यावं, अशी अट शम्मी कपूर यांनी त्यांना घातली होती. “कपूर कुटुंबातील कोणालाही त्यांच्या घरच्या सुनेने चित्रपटसृष्टीत काम करावं, ही गोष्ट पसंत नाही. त्यामुळे त्यावेळी शम्मीजींनी मला सांगितले होते की, जर तुला माझ्यासोबत आनंदात राहायचे असेल तर तुला करिअरवर पाणी सोडावे लागेल. पण माझे वय लहान असल्याने मी प्रचंड महत्त्वकांक्षी होती. मला आयुष्यात खूप काही करायचे होते. मला स्वत:चे घर उभ करायचे होते. पण त्यासाठी घरी बसून राहणे ही कल्पना मला आवडली नाही. त्यामुळे मी शम्मी कपूरला लग्नासाठी नकार दिला.” असे मुमताज यांनी सांगितले.

१९७४ मध्ये त्यांनी मयूर माधवानी यांच्यासोबत लग्न केलं आणि त्यानंतर चित्रपटसृष्टीतूनही काढता पाय घेतला आणि त्या लंडनला स्थायिक झाल्या. हिंदी चित्रपटसृष्टीत साठच्या दशकात आघाडीच्या अभिनेत्रींना टक्कर देत मुमताज यांनी स्वत:चं स्थान अबाधित राखलं. काळानुरुप बदलणारे चित्रपट, कलाकार, चित्रपटसृष्टी आणि कौटुंबिक जबाबदारीचा अंदाज घेत मुमताज यांनी त्यांच्या कुटुंबाला प्राधान्य दिलं. सध्याच्या घडीला मुमताज चित्रपटसृष्टीपासून फार दूर असल्या तरीही त्यांचं चाहत्यांच्या मनातील स्थान मात्र कायम आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why mumtaz declined shammi kapoor marriage proposal know the reasons nrp