मुंबई : मुंबईतील तब्बल ८०० वर्षे जुना माहीम किल्ला आता अतिक्रमणमुक्त झाला आहे. या किल्ल्यावरील तब्बल २६७ झोपडय़ा पालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने हटवल्या. पर्यायी जागा दिल्यानंतरही या झोपडय़ा रिकाम्या केल्या जात नव्हत्या. त्यामुळे ‘जी’ उत्तर विभागाने ही धाडसी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेमुळे माहीम किल्ल्याच्या जतनाचा प्रकल्प मार्गी लागणार आहे. माहीमचा किल्ला जतन करण्याचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे. मात्र या किल्ल्यावर गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण झाले होते. तसेच समुद्राच्या बाजूचा किल्ल्याचा भाग अत्यंत ढासळलेल्या अवस्थेत असून, पाहणी केल्यानंतर किल्ला अत्यंत जीर्ण झालेला दिसतो. त्यामुळे तेथे राहणे रहिवाशांसाठी अत्यंत जोखमीचे होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किल्ल्याचा काही भाग किंवा पूर्णपणे किल्ला कोसळल्यास मोठय़ा संख्येने जीवितहानी होण्याचा धोकाही आहे. या किल्ल्यावर २६७ झोपडय़ा आणि अंदाजे ३००० रहिवासी होते. त्यामुळे पालिकेच्या जी उत्तर विभागाने अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली. कारवाई करण्यापूर्वी माहीम किल्ल्यावरील झोपडय़ांचे सर्वेक्षण करण्यात आले. तेथील झोपडीधारकांना नोटीसा देण्यात आल्या व त्यांच्या झोपडय़ांचे पुरावे / कागदपत्रे तपासून पुराव्यांच्या आधारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रचलित धोरणांनुसार झोपडीधारकांची पात्रता निश्चित करण्यात आली. एकूण २६७ पैकी २६३ झोपडीधारक पात्र ठरले होते. झोपडीधारकांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन व्हावे म्हणून बैठक घेण्यात आली, अशी माहिती साहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिली.
झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने मालाड येथील साईराज गुराईपाडा येथे चालू असलेल्या पुनर्वसन प्रकल्पात बांधण्यात आलेल्या संक्रमण शिबीर इमारतील १७५ सदनिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी भंडारी मेटलर्जी येथील पुनर्वसन प्रकल्पाकरिता बांधण्यात आलेल्या इमारतीतील ७७ सदनिका पालिकेला हस्तांतरित केल्या. तसेच, मालवणी येथील रॉयल फिंच इमारतीमधील ११ सदनिका देखील प्राप्त झाल्या. पात्र बाधित झोपडीधारकांसाठी सोडत काढून या सदनिकांचे टप्प्याटप्प्याने वाटप करण्यात आले.

मात्र तरीही काही झोपडीधारक सदनिका न घेता, किल्ल्यावरच वास्तव्य करीत होते. त्यामुळे संपूर्ण प्रकल्प बाधित व प्रलंबित होत होता. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी पोलीसबळाच्या आधारे कारवाई केली. या वेळी विरोध करणाऱ्या झोपडीधारकांविरुद्ध नजीकच्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. माहीम किल्ल्याची दुरुस्ती करून किल्ला पर्यटनस्थळ म्हणून खुला करण्यासाठी पुरातन सल्लागार विकास दिलावरी यांची नेमणूक करण्यात येणार आहे.

इतिहास असा..
अपरंता (उत्तर कोकण ) येथील राजा बिंबदेव याने या परिसरात आपले राज्य वसवले होते. या राज्याला महिकावती असे म्हणतात. राज्य भरभराटीला आल्यानंतर वंशजांनी माहीम येथे हा किल्ला सन ११४० आणि १२४१ या काळात बांधला. इंग्रजांच्या काळात या किल्ल्याचा बंदर म्हणून वापर झाला. तेथे सीमा शुल्क गृह उभारले होते. स्वातंत्र्यानंतर सीमा शुल्क विभागाने आपले कार्यालय तेथून हलवले. मात्र आजही किल्ल्याची मालकी या विभागाकडे आहे. दरम्यान, १९७२ मध्ये, प्राचीन स्मारके, पुरातत्व स्थळे आणि अवशेष अधिनियम, १९६० अन्वये जेव्हा माहीमचा किल्ला महाराष्ट्र अंतर्गत राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आला तेव्हा सीमा शुल्क विभागाने या गडावरील विद्यमान सुरक्षा काढून टाकली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahim fort conservation project route amy