मुंबई: प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकसंवाद वाढवावा. लोकसंवादातून नागरिकांच्या प्रतिक्रियांची नोंद घ्यावी, नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी लोकसंवाद खूप आवश्यक आहे. तसेच विभागप्रमुखांनी आपापसात समन्वय ठेवावा असे आवाहन मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई महापालिकेची मुदत संपल्यामुळे महापालिकेत गेल्या दोन वर्षांपासून प्रशासकांची राजवट सुरू आहे. नागरिक आणि प्रशासनातील दुवा असलेले नगरसेवक सध्या नसल्यामुळे अधिकारी आणि नागरिकांमधील संवाद संपला आहे. मात्र हाच संवाद वाढवावा असे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सोमवारच्या आढावा बैठकीत दिले. गगराणी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, नागरी सेवा-सुविधांशी संबंधित प्रश्न हे प्रशासकीय कार्यवाहीप्रमाणेच समाजाशी, नागरिकांशी संबंधित असतात. जटील प्रश्नांची प्रशासकीय उत्तरे शोधता येतात. प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकसंवाद वाढवणे फार गरजेचे आहे. कारण, लोकसंवाद हे नागरिकांच्या प्रतिक्रियांची नोंद घेणे, त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे योग्य निराकरण करणे आदींसाठी महत्वपूर्ण आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विभागांनी आपापसांत उत्तम समन्वय ठेवावा, असे आवाहनही आयुक्तांनी यावेळी केले.

हेही वाचा : मुंबईतील २२ हजार झाडांची छाटणी पूर्ण, ४ हजार ९०९ आस्थापनांना नोटीस बजावली

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी पार पडलेल्या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह विविध सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त, विविध खात्यांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर उद्या दोन तासांचा वाहतूक ब्लॉक

एकतरी अभिनव प्रकल्प राबवावा …..

मुंबई महानगरपालिका ही जगभरात नावलौकीकप्राप्त संस्था आहे. महानगरपालिकेच्या स्थापनेपासून आजवरच्या १५० वर्षांच्या कार्यकाळात तत्कालीन पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी घेतलेले निर्णय, राबविलेल्या अभिनव प्रकल्पांमुळे हे नावलौकिक आहे. प्रकल्प उभारणाऱ्या तत्कालीन अधिकाऱ्यांचे नाव आजही स्मरण केले जाते. त्यामुळे विद्यमान अधिकाऱ्यांनी जनहित लक्षात घेऊन आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनांच्या मदतीने किमान एकतरी असा अभिनव प्रकल्प सुरू करायला हवा. जो दीर्घकाळ टिकेल, दूरदृष्टीचा प्रकल्प म्हणून ओळखला जाईल असेही आवाहन पालिका प्रशानाने केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai municipal corporation transparent administration bmc commissioner s appeal to officials mumbai print news css