मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर आज मनसेचा गुढी पाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. दरम्यान, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शिवाय उद्धव ठाकरे यांच्यामुळेच आपल्याला शिवसेना कशी सोडावी लागली? तो प्रसंगही सांगितला आहे. यावेळी केलेल्या भाषणातून राज ठाकरे यांनी ठाकरे गटाला थेट इशारा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाकरे आणि शिंदे गटातील ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्हाच्या वादावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, “शिवसेनेचं ‘धनुष्यबाण’ हे नुसतं धनुष्यबाण नव्हतं, ते शिवधनुष्य होतं. ते बाळासाहेब ठाकरे सोडून इतर कुणालाही पेलणार नाही, झेपणार नाही, हे मला माहीत होतं. एकाला झेपलं नाही, आता दुसऱ्याला झेपतं की नाही? हे माहीत नाही.

हेही वाचा- “महाराष्ट्रात लूट करून सुरतला गेलेले एकनाथ शिंदे पहिलेच”, राज ठाकरेंचा हल्लाबोल!

काही गोष्टी तुमच्याशी बोलाव्या वाटल्या म्हणून मी बोलतोय. मला पुन्हा या गोष्टींचा चिखल करायचा नाही. घरातल्या गोष्टी बाहेरही काढायच्या नाहीत. मी आताच त्यांच्या बाजुच्या लोकांना (ठाकरे गट) सांगतो, माझं बोलणं झाल्यावर उद्या तोंड उचकटू नका. त्यानंतर माझ्या थोबाडातून जे बाहेर पडेल, ते तुम्हाला झेपायचं नाही,” असा थेट इशारा राज ठाकरेंनी ठाकरे गटाला दिला आहे.

हेही वाचा- “…तेव्हा खूप वेदना होत होत्या”, शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादावर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले, म्हणाले…

राज ठाकरे पुढे म्हणाले, “मला फक्त एक-दोन घटना सांगायच्या होत्या, ज्यामुळे तुम्हाला आताच्या परिस्थितीचा अंदाज येईल. पण सगळ्यांना वाटतं की, मी फक्त महाबळेश्वरचा प्रसंग सांगतोय. पण त्या अगोदर काय-काय गोष्टी घडल्या, हे सांगणं गरजेचं आहे. कारण आताची परिस्थिती का ओढावली? हे तुम्हाला समजेल. त्या काळात अनेक गोष्टी घडल्या. मला भिंतीकडे दाबण्याचा प्रयत्न होतोय, हे मला माहीत होतं. माझे होर्डिंगवर फोटो टाकू नका, असं सांगितलं जात होतं. पण मला याचा काहीही फरक पडत नव्हता.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray on uddhav thackeray group dont open your mouth mns gudhipadava melava rmm