शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारकडून ‘इंडिया’ नावाचा वापर टाळला जात आहे त्यावर सडकून टीका केली. “देशातील विरोधी पक्षांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली, म्हणून इंडियाचं नाव पुसून टाकण्यासारखा दुसरा घाबरटपणा, कद्रुपणा, विकृतपणा नाही,” असं म्हणत संजय राऊतांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ते बुधवारी (६ सप्टेंबर) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत म्हणाले, “आम्ही ‘इंडिया’ आघाडी स्थापन केल्यापासून त्यांना इंडिया या शब्दाचंच भय वाटायला लागलं. एखाद्या पक्षाला, एखाद्या सरकारला देशाच्या घटनेतील नावाविषयी भय वाटू लागतं हा विचित्र प्रकार आहे. घटनेत इंडिया नाव आहे. घटनेत भारत हेही नाव आहे. मात्र, देशातील विरोधी पक्षांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली, म्हणून इंडियाचं नाव पुसून टाकण्यासारखा दुसरा घाबरटपणा, कद्रुपणा, विकृतपणा नाही.”

“हे चांद्रयानात बसून चंद्रावर जाऊन काम करत आहेत का?”

“भाजपा रिपब्लिक ऑफ भारत लिहितात. खरंतर यांनी ‘नया भारत’ निर्माण करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे त्यांनी आता रिपब्लिक ऑफ नया भारत म्हणायला हवं. या भारताशी, इंडियाशी भाजपाचा संबंध नाही. हे कोणत्या ग्रहावरून काम करत आहेत. हे चांद्रयानात बसून चंद्रावर जाऊन काम करत आहेत का?” असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला.

हेही वाचा : “ज्या दिवशी संध्याकाळी हा लाठीमार सुरू झाला त्यावेळी मुंबईत…”; संजय राऊतांचं मोठं विधान

“इंडिया आहे , इंडिया राहील आणि इंडिया सत्तेतही येईल”

संजय राऊतांनी इंडिया आहे आणि इंडिया राहील, असं म्हटलं. तसेच इंडिया भविष्यात सत्तेतही येईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी राऊतांनी एक देश, एक निवडणुकीवरही सडकून टीका केली आणि ही कल्पना म्हणजे देशातील एक फ्रॉड असल्याचं म्हटलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut criticize modi government over india bharat issue pbs