मुंबई : Water shortage in Mumbai संपूर्ण मुंबईत ३१ मार्चपासून महिनाभर १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे कुपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचून गळती होत असल्याने दुरुस्तीकामासाठी हा निर्णय घेण्यात आला. मुंबई पालिकेच्या वतीने ठाणे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठय़ातही कपात करण्यात आली आहे. जलबोगदा पाणीगळती दुरुस्तीचे काम शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे शहरास होणाऱ्या प्रक्रियायुक्त पाणीपुरवठय़ात ३१ मार्चपासून अंदाजे ३० दिवस १५ टक्के कपात करण्यात येणार आहे, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

  मुंबई शहर आणि उपनगराच्या एकूण पाणीपुरवठय़ापैकी सुमारे ६५ टक्के पाणीपुरवठा हा भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्राद्वारे केला जातो. या केंद्रास होणारा ७५ टक्के पाणीपुरवठा मुख्यत्वे ५,५०० मिमी व्यासाच्या १५ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याद्वारे होतो. ठाणे येथे कूपनलिकेच्या खोदकामादरम्यान या जलबोगद्याची हानी झाली. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पाणीगळती होत आहे. दुरुस्तीकामासाठी हा जलबोगदा पूर्णपणे बंद करणे आवश्यक आहे. हा जलबोगदा बंद करून दरम्यानच्या काळात पर्यायी जलवाहिन्यांद्वारे भांडुप संकुल जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहोचविणे आवश्यक आहे. मात्र, सध्या भांडुप संकुल येथे प्रक्रिया होत असलेल्या प्रमाणाइतके पाणी पोहोचविणे आणि प्रक्रिया करणे शक्य होणार नाही. त्यामुळे पाणी कपात करण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water cut in mumbai shortage for a month from friday due to repair of water tunnel ysh
First published on: 29-03-2023 at 00:36 IST