लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) वर्षाअखेरीस मोठी कारवाई करीत एकाच वेळी तिघा लाचखोरांना जाळ्यात अडकवले. या कारवाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालय, विधिक्षेत्रासह जिल्ह्याचे प्रशासकीय वर्तुळ चांगलेच हादरले आहे. लाचखोरांमध्ये स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादनचे (मध्यम प्रकल्प) उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे, लिपिक नागेश खरात आणि मध्यस्थी करणारा वकील अनंता देशमुख यांचा समावेश आहे.
हेही वाचा >>> “तुझ्यासारखे बरेच पाहिले”, वंजारी आणि लाड विधानपरिषदेत एकमेकांना भिडले; नीलम गोऱ्हे खडसावत म्हणाल्या, “मारामारी…”
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून त्याची जमीन जिगाव सिंचन प्रकल्पामध्ये गेली आहे. त्यामुळे वारसा हक्कानुसार त्याला मोबदला मिळवून देण्यासाठी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांनी दहा टक्क्यांप्रमाणे २ लाख १० हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र १ लाख रुपयात हा व्यवहार ठरला. फिर्यादीने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. दरम्यान, आज बुधवारी संध्याकाळी भिकाजी घुगे व लिपिक खरात यांच्या सांगण्यावरून वकील अनंता देशमुख यांस जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच १ लाख रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. वृत्त लिहिस्तोवर ‘एसीबी’ची कारवाई सुरूच होती.
आठ वर्षांपूर्वीही झाले होते ‘ट्रॅप’!
लाचखोरीचे व्यसन जडलेल्या घुगे यांना ‘एसीबी’च्या कारवाईला सामोरे जाणे नवीन नाही. आठ वर्षांपूर्वी त्यांना मराठवाड्यात कार्यरत असताना असेच पकडण्यात आले होते. त्यावेळी लाचेची रक्कम १२ हजार रुपये होती. उस्मानाबाद येथे जिल्हा पुरवठा अधिकारी पदावर कार्यरत असताना त्यांच्या मार्फत अधीनस्थ लिपिकाला १२ हजाराची लाच घेताना पकडण्यात आले होते.