गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्याच्या ग्राम घाटबोरी/कोहळी येथील शेतात तुटलेल्या जिवंत विद्युत ताराला स्पर्श झाल्याने दाम्पत्याचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज, २० सप्टेंबर रोजी घडली. तुळशीदास रेवाराम लंजे (४५) व माया तुळशीदास लंजे (४२) दोन्ही रा.घाटबोरी/कोहळी अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. इंदू हिरालाल लंजे (४३) ह्या गंभीर जखमी आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सडक-अर्जुनी तालुक्याच्या कोदामेडी ते सिंदीपार मार्गावरील आपल्या शेतात धानाचे निंदण करण्यासाठी लंजे कुटुंबीय बुधवारी शेतात गेले होते. दरम्यान, शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दाम्पत्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या हिरालाल लंजे यांनी लाकडी काठीने विद्युत तारेला लांब फेकले. यामुळे इंदू हिरालाल लंजे यांचे प्राण वाचले. त्यांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय सडक-अर्जुनी येथे हलविण्यात आले आहे.

हेही वाचा >>> विमानतळावरील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या चबूतऱ्याची उंची वाढवण्याची मागणी का होतेयं..

प्राप्त माहितीनुसार, लंजे यांच्या शेतातून विद्युत विभागाची ३३ एल.टी. ची वीज लाईन गेली आहे. ५ ते ६ दिवसांपासून वीजेचे तार शेतात तुटून पडले होते. याची माहिती काही शेतकऱ्यांनी विद्युत विभागाला दिली होती. मात्र विद्युत विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे शेतकरी सांगतात. ही बाब लंजे यांना माहीत नव्हती, त्यामुळे चालू विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Couple dies woman critical after touching electrical wire sar 75 ysh