नागपूर : शासनाने नागपुरात अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थिनींच्या वसतिगृहासाठी निधी दिला. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि एलआयटी विद्यापीठांमध्ये (लक्ष्मीनारायन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलाॅजी) जागेवरून वाद उद्भवल्याने वसतिगृहाचा निधी परत जाण्याचा धोका आहे. मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारसी आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थिनींसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात २०० प्रवेश क्षमतेचे वसतिगृह बांधण्यास शासनाने काही वर्षांपूर्वी मंजुरी दिली. त्यानुसार अल्पसंख्याक खात्याने १४ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी दिली. वसतिगृहासाठी जागा निश्चित झाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा प्रक्रिया व जागेची आखणीही झाली. परंतु एलआयटी ॲल्युिमिनाय असोसिएशनने यावर आक्षेप घेतल्याने बांधकाम रखडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही जागा एलआयटी विद्यापीठाच्या जवळ आहे. तेथे एलआयटी विद्यापीठाच्या विद्यार्थिंनीसाठीही एक वसतिगृह व अल्पसंख्याक समाजाच्या मुलींसाठीही एक वसतिगृह वेगवेगळ्या जागी होईल. परंतु एलआयटीने केवळ अल्पसंख्याक विद्यार्थिनींच्या वसतिगृहाच्या जागेवर आक्षेप घेतला. ही जागा एलआयटीची असल्याचा त्यांचा दावा आहे. एलआयटीचे माजी विद्यार्थी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले व त्यानंतर येथील बांधकाम थांबवण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाने नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे नवीन जागेची मागणी केली. त्यावर काळमेघ यांच्या बंगल्याच्या ठिकाणी व त्यानंतर नेल्सन मंडेला वसतिगृहाजवळ हे वसतिगृह बांधण्याबाबत चाचपणी झाली. परंतु एलआयटी ॲल्युमिनाय असोसिएशनने पुन्हा आक्षेप घेतल्याने हा प्रकल्प अडचणीत आला. त्यामुळे प्रकल्पाचा निधी परत जाण्याची शक्यता असून असे झाल्यास अल्पसंख्याक विद्यार्थिनींना या वसतिगृहाला कायमचे मुकावे लागेल.

हेही वाचा : कोतवाल भरतीमधून स्पष्ट झाली बेरोजगारीची तीव्रता! दीडशे पदासाठी चार हजारांवर अर्ज; उच्चशिक्षितही रांगेत

नवाब मलिक यांच्या काळात मंजुरी

या वसतिगृहाला तत्कालीन अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या काळात मंजुरी मिळाली होती. विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही वसतिगृहासाठी आग्रही होते. त्यांनी काही सूचनाही केल्याचे कळते. तरीही काम थांबलेलेच आहे. नागपुरात विदर्भाच्या वेगवेगळ्या भागातून गरीब अल्पसंख्याक मुली शिकायला येतात. त्यांच्यासाठी हा प्रकल्प होणे गरजेचे आहे.

हेही वाचा : “नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू”, सुधीर मुनगंटीवार असे का म्हणाले…

अधिकारी काय म्हणतात?

एलआयटी विद्यापीठाचे संचालक राजू मानकर यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला व कुलसचिवांशी बोलण्याचा सल्ला दिला. नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे म्हणाले, एलआयटी हे स्वतंत्र विद्यापीठ झाल्याने वसतिगृहाच्या जागेचा प्रश्न उद्भवला आहे. या विषयावर अद्याप तोडगा निघाला नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग व एलआयटीशी बोलणे सुरू आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur funds for hostel of minority students may go back to the government due to dispute between nagpur university and lit mnb 82 css