विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांची माहिती; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रेल्वे प्रवाशांची संख्या ज्या वेगाने वाढत आहे,  त्या तुलनेत पायाभूत सुविधा वाढण्याचा वेग कमी आहे. परिणामी, पायाभूत सुविधांवर ताण पडतो. परंतु अधिकाधिक प्रवाशांना उत्तम सेवा कशी प्राप्त होईल, यासाठी रेल्वे प्रयत्नरत आहे. या क्रमात वेळोवेळी अतिरिक्त डबे लावणे आणि गर्दीच्या मार्गावर विशेष गाडय़ा सोडण्यासारख्या उपाययोजना केल्या जात आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांनी दिली.

लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते.पाटील म्हणाले, सर्वच मार्गावर प्रवाशांची गर्दी आहे. त्या तुलनेत रेल्वेकडे पायाभूत सुविधा नाहीत. प्रत्येक गाडीला प्रतीक्षा यादी असते. प्रतीक्षा यादीतून बघून रेल्वेडबे वाढण्याचा प्रयत्न असतो. अलीकडे दुरान्तोला अतिरिक्त दोन डबे लावले. दररोज सकाळी सर्व प्रमुख गाडय़ांची स्थिती लक्षात घेतली जाते. शयनयानमध्ये काय स्थिती, वातानुकूलित डब्यात किती प्रतीक्षा यादी आहे, हे सर्व जाणून त्यावर उपलब्ध साधनसामग्रीमध्ये अधिकाधिक प्रवासी कसे प्रवास करू शकतील, असा आमचा प्रयत्न असतो. त्यासाठी महत्त्वाच्या सर्वच गाडय़ांना २४ डबे लावण्यात आले आहेत. प्रत्येक गाडीला किमान दोनतरी सार्वसाधारण डबे जोडले जातात. उन्हाळ्यात, दिवाळीत, नाताळात विशेष गाडय़ा चालवण्यात येतात. या गाडय़ांची माहिती जास्तीत लोकांपर्यंत पोहचावी म्हणून ‘जिंगल्स’ तयार केले जात आहेत. ते समाज माध्यम, रेल्वेस्थानक, रेल्वेगाडय़ांमध्ये वाजवण्यात येतील.

रेल्वेचा स्वच्छता अभियानावर खूप भर आहे. लोकांना स्वच्छता पाळण्याची सवय लागावी, जेणकरून अनावधानाने सुद्धा त्यांच्याकडून अस्वच्छता होऊ नये. यावर काम सुरू आहे. याशिवाय अपघात टाळण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. रेल्वे तंत्रज्ञानाचा उपयोग करीत प्रवाशांच्या सुविधा वाढण्यात कायम अग्रेसर राहिली आहे. अनारक्षित तिकीट खरेदी करण्यासाठी तिकीट खिडकीवर रांगेत राहण्याची प्रवाशांना गरज पडू नये म्हणून मोबाईल यूटीसी अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. यूटीसीद्वारे फलाट तिकीट सोडून सर्व अनारक्षित तिकीट खरेदी करता येतात. या अ‍ॅपद्वारे पाच रुपयांचे तिकीट देखील खरेदी करता येते. रेल्वे प्रवासादरम्यान कुठलीही अडचण आली किंवा तक्रार असल्यास हेल्पलाईन क्रमांक १३८ आहे. याशिवाय डीआरएम नागपूर नावाने ट्विटर हँडल आहे. यावर प्रवाशांनी तक्रार केल्यास त्यावर तातडीने निराकरण केले जाते. डब्यातील कचरा असल्यास पुढील स्थानकावर कचरा सफाई कर्मचारी संबंधित रेल्वेडब्यात पाठवण्यात येते. या क्रमांकावर तक्रार प्राप्त होताच संबंधित विभागाला तातडीने कळवले जाते. यावर रेल्वे सुरक्षा दलाची देखील मदत प्राप्त होते, असेही पाटील म्हणाले.

एकटय़ा नागपूरचे उत्पन्न ५२ टक्के

नागपूर हे भौगोलिकदृष्टय़ा मध्यवर्ती ठिकाणी असल्याने देशाच्या सर्व प्रमुख शहाराकडे जाणाऱ्या रेल्वेगाडय़ा नागपूर मार्गे जातात. शिवाय मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कोळसा वाहतूक मोठय़ा प्रमाणात होते. एवढेच नव्हे तर सिमेंट आणि ढेप याची वाहतूक होते. या विभागाचा छिंदवाडा, इटरासी, बडनेरा, बल्लारशहा, वणी आणि पिंपळकुटीपर्यंत परिसर आहे.  दररोज सुमारे २५ मालगाडय़ा भरून जातात आणि तेवढय़ाच येतात. मुंबई, पुणे, भुसावळ, कोल्हापूर आणि नागपूर या मध्य रेल्वेच्या विभागांच्या एकूण उत्पन्नात एकटय़ा नागपूरचे उत्पन्न ५२ टक्के आहे. सर्वाधिक महसूल देणारा हा विभाग आहे.

नागपूर विभागात दररोज ५५० गाडय़ांची वर्दळ

मध्य रेल्वेचा नागपूर विभाग सर्वात व्यस्त विभाग आहे. येथे दररोज २४४ मेल आणि एक्सप्रेस तसेच ५० पॅसेंजर  ये-जा करतात. याशिवाय २०० ते २५० मालगाडय़ांची वर्दळ असते. या विभागाचा विस्तार सुमारे एक हजार किलोमीटपर्यंत आहे. एक हजार किलोमीटरमध्ये दररोज सुमारे ५५० रेल्वेगाडय़ा चालवणे अंत्यत जिकरीचे काम आहे. पण, नागपूर विभाग ते काम अतिशय कौशल्याने करीत आहे.

कोळसा वाहतूक महत्त्वाची

विजेची खूप मागणी आहे. त्यासाठी औष्णिक वीज प्रकल्पांना कोळसा पोहवण्याची जबाबदारी रेल्वेची आहे. पावसाळाभर पुरेल एवढा कोळसा साठा औष्णिक वीज प्रकल्पात केला जातो. त्यामुळे काही पॅसेंजर गाडय़ांना रद्द करून किंवा विलंबाने सोडून मालगाडय़ांना प्राधान्य दिले जाते. मोठय़ा प्रमाणात कोळसा वाहतुकीसाठी रेल्वेला अद्यापतरी विदर्भात दुसरा पर्याय नाही.

अजनी इंटर मॉडेल स्टेशन

नागपूर रेल्वेस्थानकाचा विकास भारतीय रेल्वे स्टेशन विकास महामंडळ करीत आहे. त्यासाठी वित्तीय भागीदार शोधला जात आहे. अजनी रेल्वे स्थानक इंटर मॉडेल स्टेशन म्हणून विकसित करण्यात येत आहे. हे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) करणार आहे. याशिवाय नागपूर ते सेवाग्राम दरम्यान तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग तयार करण्यात येत आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increasing railway passengers the speed of infrastructure increases drastically abn