नागपूर : शेतकऱ्याने रासायनिक शेतीवर अवलंबून न राहता विषमुक्त शेती करावी. देशी वाणाचे जतन करावे. कारण जुनं ते सोनं अन् खणखणतं नाणं आहे, असे मत बीजमाता म्हणून गौरवलेल्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले. उपराजधानीत आयोजित भारतीय विज्ञान काँग्रेससाठी आल्या असता त्या बोलत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहीबाई म्हणाल्या, अन्नाचा प्रत्येक कण विषमुक्त असावा, भविष्यात मानवी आरोग्याचा विचार करून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरावी, यासाठी मी बीज जतन करण्याचे कार्य करीत आहे. सध्या मी ५२ पिकांच्या १५७ वाणांचे जतन करून शासकीय नोंदणी केली आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – नीता अंबानी यांनीही महिला विज्ञान काँग्रेसला येण्याचे टाळले

अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावातील महिला शेतकरी ते पारंपरिक बियाण्यांच्या वाणांच्या संरक्षक-संवर्धक, असा राहीबाई पोपेरे यांचा प्रवास झाला आहे. देशी वाणांच्या बियाण्यांची जपणूक केल्याबद्दल त्यांना भारत सरकारने २०२० मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काने गौरवले.

राहीबाई यांना बीजमाता म्हणून संबोधले जाते. त्यांना बीबीसीने १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत स्थान दिले आहे. त्या पुढे म्हणाल्या की, देशी बियाणे आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सुरुवातीला मला घरातूनच विरोध होता. परंतु, विरोध झुगारून जिद्दीने बियाण्यांची बँक तयार केली. माझ्या घरातील मोठी जागा बियाण्यांचे जतन करण्यासाठी राखीव ठेवली. विषमुक्त अन्न ही संकल्पना पहिल्यांदा माझ्या कुटुंबीयांना त्यानंतर गावकऱ्यांना समजावून सांगितली. लोकसहकार्याच्या माध्यमातून आज ५२ पिकांचे देशी वाण माझ्याकडे आहेत. भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिल्याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, पद्मश्री पुरस्कार मी माझी माती आणि माझ्या शेतकरी बांधवांना समर्पित करते. भविष्यात माझ्या कुटुंबीयांनी आणि माझ्या शेतकरी बांधवांनी माझा वसा सांभाळून ठेवावा, अशी इच्छाही त्यांनी व्यक्ती केली.

हेही वाचा – धक्कादायक!‘न्युमोनिया’मुळे दर तासाला देशात १४ बालकांचा मृत्यू – डॉ. शैली अवस्थी मिश्रा

माझ्याकडे या, बियाणे घेऊन जा…

सेंद्रिय शेतीची कास धरल्यामुळे मला अनेकांनी विरोध केला. विरोधाला झुगारून देशी बियाण्याकडे मी वळले. देशातील कोणत्याही शेतकऱ्याने माझ्याकडे यावे व देशी वाणाचे बियाणे न्यावे. अट एवढीच की, त्या शेतकऱ्याने ते बियाणे आणखी १० शेतकऱ्यांना द्यावे. जर ही साखळी सुरू राहिली तर अख्खा भारत देश विषमुक्त अन्न खाईल, असे राहीबाई म्हणाल्या.

बीज बँक ते शेतकऱ्यांची साखळी

पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी देशी बियाण्यांची एक आगळीवेगळी बीज बँकच सुरू केली. त्यांच्या या बँकेत पांढरी वांगी, हिरवी वांगी, पांढरी तूर, टोमॅटो, घेवडा, वाल, उडीद, हरभरा हुलगा, बाजरी, गहू, नागली, तीळ, भुईमूग, सूर्यफूल, जवस, भात, राळा, नाचणी, रायभात, अनेक प्रकारच्या रानभाज्यांचा समावेश आहे.

हेही वाचा – फळ्यावर लिहा, नंतर खाऊन घ्या!, चिमुकल्या संशोधकाने तयार केला पौष्टिक खडू

विशेष म्हणजे, त्यांच्या घराभोवती तीन एकर परिसरात विविध प्रकारची ४००-५०० झाडे आहेत. त्यांचे घर म्हणजे एक प्रकारचे संशोधनाचे केंद्र बनले आहे. त्यांना प्रत्येक बियाण्याची माहिती अगदी तोंडपाठ आहे. त्यांनी शेतकऱ्यांची साखळी तयार करून जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना बियाण्यांचा पुरवठा करून उत्पादन घेणे सुरू केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Padmashri rahibai popere special interview to loksatta she came for the indian science congress organized in nagpur adk 83 ssb