जळगाव : राज्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचे अपघात थांबता थांबत नाहीत. यामुळे आता प्रवाशांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अचानक टायर फुटल्याने बस रस्त्यालगतच्या थेट शेताच्या बांधावर जाऊन आदळली. ही दुर्घटना शुक्रवारी सकाळी मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा-काकोडा गावानजीक घडली. अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले.
मुक्ताईनगर आगाराची बस शुक्रवारी जळगाव जामोद येथून निघाली. ती काटेलधामकडे जात असताना मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा-काकोडा गावानजीक पारंबी फाट्याजवळ बसचे टायर अचानक फुटले. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्यालगतच्या शेताच्या बांधावर जाऊन आदळली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेत घटनास्थळी मदतकार्य केले. अपघातात नऊ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, त्यांना रुग्णावाहिकेतून मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
हेही वाचा >>> नाशिक: रस्ते कामातील नियोजनाअभावी दुचाकीस्वाराचा मृत्यू
सुदैवाने अपघातात जीवितहानी टळली आहे. बसमधील जखमी प्रवाशांमध्ये सुनील झांबरे (२२, रा. आळंद), समाधान तायडे (६९, रा. मानेगाव), कमल पवार (५९, रा. वढोदा), जानकोर महाले (७५, रा. वढोदा), नलिनी न्हावी (७०, वढोदा), अनुराधा पाटील (३५, मेळसांगवे), कस्तुराबाई भोलणकर (७०, शिरसोली), सपना पाटील (२७, जामनेर), सार्थक पाटील २, जामनेर) यांचा समावेश आहे.