नाशिक : धरणात पाण्याचा साठा अपुरा आणि कमी असल्याची सबब सांगत महानगराचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्यासाठी आणि त्यादृष्टीने सुरू झालेल्या हालचालींमागे राजकीय वास असल्याचा संशय ठाकरे गटाने व्यक्त केला आहे. महानगरपालिकेने पाणी कपातीचा कोणताही निर्णय घेतल्यास ठाकरे गटाचा त्याला कडाडून विरोध राहील, असा इशारा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिला आहे. याबाबत आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिककरांना वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध करून देण्याची आणि त्याचे नियोजन करण्याची जबाबदारी जलसंपदा खात्याची आहे. परंतु, आता धरणात पुरेसा साठा नसल्याचे कारण सांगून महानगरपालिकेला पाणी कपात करण्यास भाग पाडण्यात काही राजकारण आहे काय, असा संशय घेण्यास निश्चितच वाव असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे. धरणातील पाण्याचे नियोजन करताना प्रथम पिण्यासाठी आणि नंतर सिंचनासह अन्य बाबींसाठी राखून ठेवण्याची प्रथा आहे. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. धरणातही मुबलक पाणीसाठा होता आणि आजही तो आहे. मात्र जलसंपदा खाते महानगरपालिकेची दिशाभूल करून अडचण निर्माण करीत आहे. महानगरपालिकेने जलसंपदा खात्याशी पत्रव्यवहार करून वाढीव पाण्याचे नियोजन करण्यास भाग पाडले पाहिजे. गंगापूर धरणाच्या समूह साठ्यात पाच टीएमसी तर दारणा धरणाच्या समूह साठ्यात नऊ टीएमसी म्हणजे एकूण १४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असताना त्याचे योग्य पद्धतीने नियोजन करण्याची जबाबदारी जलसंपदा खात्याची असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> धुळे: चमकणारी मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्याला आग, चार महिलांचा होरपळून मृत्यू

नाशिक शहरासाठी ऑगस्ट अखेरपर्यंत २.६ टीएमसी पाणी पिण्यासाठी लागणार आहे. सिंचनासाठी चार आवर्तन गृहीत धरले तरी १.२ टीएमसी पाणी लागेल. पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याचा एकत्रित विचार केला तरी एकूण ३.८ टीएमसी पाणी ३१ ऑगस्ट अखेरपर्यंत लागणार आहे. त्यामुळे अतिरिक्त १० टीएमसी पाणीसाठा कुणासाठी राखीव ठेवला आहे, याचे स्पष्टीकरण जलसंपदा खात्याने द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पालिकेने पाण्याच्या नियोजनाबाबत जलसंपदा खात्यावर बारकाईने अंकुश ठेवणे गरजेचे आहे. धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक असताना पाणी कपातीचा निर्णय नाशिककरांवर अन्याय करणारा ठरेल. महानगरपालिकेने एक महिन्यासाठी लागणारा अतिरिक्त पाणी साठा जलसंपदा खात्याकडून मंजूर करून घ्यावा. जलसंपदा खात्याने त्याबाबत नकारात्मक उत्तर दिले आणि वाढीव पाण्यास नकार दिल्यास महानगरपालिकेने जनतेसमोर प्रशासनाची भूमिका स्पष्ट करावी. त्यानंतरही जलसंपदा खाते आडमुठेपणाची भूमिका घेणार असेल तर शिवसेना ठाकरे गटाकडून जलसंपदा खात्यावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा बडगुजर यांनी दिला आहे. निवेदनावर उपनेते सुनील बागुल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, विलास शिंदे आदींची स्वाक्षरी आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik protest if water is cut thackeray group warns ysh