-
युपीए सरकारच्या काळात केंद्रीय कृषीमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळत असताना शरद पवार यांनी कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त करत अनेक राज्यांना पत्र लिहिलं होतं. सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे पत्र पुन्हा एकदा व्हायरल झालं असून भाजपा पाठिंबा देण्यावरुन शरद पवारांवर निशाणा साधत आहे. (सर्व फोटो – संग्रहित)
-
विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सोमवारी पत्राचा उल्लेख करत शरद पवारांवर टीका केली होती. दरम्यान दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी यावर भाष्य केलं.
-
-
"ज्यांनी पत्राचा हवाला दिला आहे त्यांनी ते थोडं नीट वाचलं असतं तर त्यांचा वेळ वाचला असता," असा टोला त्यांनी लगावला.
-
"कायद्यातील सुधारणांसंदर्भात पत्र लिहिलं होतं यामध्ये कोणतंही दुमत नाही. पण आज जे तीन नवे कृषी विधेयक आणले आहेत त्यात याचा उल्लेख दिसत नाही," असंही यावेळी त्यांनी सांगितलं.
-
शरद पवार यांनी यावेळी विषय भरकटवण्यासाठी हे केलं जात असल्याचाही आरोप केला. याला जास्त महत्व देऊ नका असंही ते म्हणाले आहेत.
-
शरद पवारांनी आपण शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचं सांगत अधिक बोलण टाळलं.
-
"उद्या आम्ही वेगवेगळ्या पक्षातील लोक एकत्र बसून चर्चा करणार आहोत आणि एकमताने निर्णय घेणार आहोत. त्यामुळे एकट्याने भूमिका मांडणं योग्य नाही. आम्ही उद्या राष्ट्रपतींची भेट घेणार आहोत. त्यांच्यासमोर आमची एकत्रित भूमिका मांडू," असं यावेळी त्यांनी सांगितलं.
-
मात्र पत्रकारांनी वारंवार पत्र आणि शेतकरी आंदोलनाबद्दल प्रश्न विचारल्याने शरद पवार संतापले. "शेतीच्या मुद्यावर मी बोलणार नाही. जोपर्यंत चर्चा होत नाही तोपर्यंत मी यावर मत प्रदर्शन करणार नाही," असं ते म्हणाले.
-
"राष्ट्रवादी किंवा शरद पवारांची वेगळी भूमिका नसावी. उद्या यावर चर्चा करु," असं शरद पवारांनी सांगितलं.
-
पत्रकारांनी पुन्हा एकदा त्यांना शेतकरी आंदोलन आणि २०१० मधील पत्रासंबंधी विचारलं. यावर त्यांनी मी एकदा उत्तर दिलं आहे. माझं पत्र नीट वाचा एवढंच म्हणत आहे असं उत्तर दिलं. (PTI)
-
पण यानंतर जेव्हा पत्रकारांनी पुन्हा त्याच विषयावर प्रश्न विचारले तेव्हा मात्र शरद पवार संतापले. (PTI)
-
"तुम्ही माझा वेळ घालवत आहात. मी शेतीच्या मुद्यावर बोलणार नाही सांगितलं असतानाही तुम्ही वारंवार तोच प्रश्न विचारत आहात. तुम्ही बाहेर उभे होता हे मला योग्य वाटलं नाही म्हणून बोलावलं. माझी चूक झाली यानंतर पुन्हा करणार नाही," असं सांगत शरद पवार पत्रकार परिषद सोडून निघून गेले.
-
फडणवीसांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कायद्याच्या मूलभूत तत्त्वांना विरोध केलेला नाही याकडेही लक्ष वेधलं होतं.
-
"शरद पवार यांनीही कृषीमंत्री असताना कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यातील बंधने हटवून शेतकऱ्यांना कोठेही शेतीमाल विकण्याची मुभा असली पाहिजे, यासह सर्व सुधारणांचे समर्थन केले होते. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कृषीमंत्री नात्याने पत्रही लिहिले होते. काँग्रसच्या २०१९ च्या निवडणूक जाहीरनाम्यात कृषी सुधारणांचे आश्वासन आहे. कंत्राटी शेतीचा कायदा राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने केला असून गेली १३-१४ वर्षे तो लागू आहे. त्यामुळे शेतीतील खासगी गुंतवणूक वाढली आहे. पण पंतप्रधान मोदी यांना विरोधासाठी विरोध करण्यासाठी राजकीय विरोधक एकवटले असल्याचा," आरोप फडणवीस यांनी केला.
-
यानंतर राष्ट्रवादीकडूनही शरद पवारांच्या त्या पत्रासंदर्भात खुलासा करत स्पष्टीकरण देण्यात आलं होतं.
-
दरम्यान शरद पवार बुधवारी पाच वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. याआधी ते इतर पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत.

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”