-
मुंबईला स्वतंत्र करण्याच्या भाजपा नेत्यांच्या भाषेमुळे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपाचा डाव उघड झाला आहे. मात्र तसा प्रयत्न करणाऱ्यांचे तुकडे तुकडे होतील, असा इशारा देत भाजपाच्या विकृत-विखारी हिंदुत्वामुळे देशाची दुर्दशा झाल्याची टीका मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत केली. (सर्व फोटो : अमित चक्रवर्ती, शिवसेना ट्विटर हॅण्डलवरुन साभार)
-
त्याचबरोबर आता शिवसेना मैदानात उतरत असल्याचे सांगत राजकीय लढाईचे रणशिंग उद्धव ठाकरेंनी फुंकले.
-
शिवसेनेने सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री ठाकरे यांची सभा शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर झाली.
-
या सभेला शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली.
-
या सभेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपाचे हिंदुत्व, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा समाचार घेतला.
-
केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केल्यास दया माया न दाखवता पळता भुई थोडी करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी भाजपा नेत्यांना दिला.
-
तसेच महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र बसू आणि लोकांच्या हिताची कामे करू, असे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले.
-
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुंबईला स्वतंत्र करण्याची भाषा केली. पोटात असलेले ओठांवर आले असून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा त्यांचा मनसुबा उघड झाला आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
-
पुढे बोलताना “पण तुमच्या मालकांसह १७ पिढ्या खाली आल्या तरी मुंबई मराठी माणसाचीच राहील, ती महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही. मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे तुकडे तुकडे होतील,” असा इशारा ठाकरे यांनी दिला.
-
भाजपाचे हिंदुत्व विकृत असून ते आम्हाला मान्य नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
-
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार दिला. पण भाजपा हिंदुत्वाचा विखार पसरवत आहे. या हिंदुत्त्वातून देशाला दिशा काय देणार? त्यातून देशाची दुर्दशा होत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. हिंदुत्वासाठी तुम्ही काय केले, याचे दाखले समोर ठेवा, असे आव्हानही मुख्यमंत्र्यांनी दिले.
-
ते देश पेटवणारे, तर आम्ही चूल पेटवणारे आहोत. हृदयात राम आणि हाताला काम हे आमचे धोरण आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
-
भाजपाचे हिंदुत्ववादी खालच्या पातळीची, विखारी भाषा करतात. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल गलिच्छ विचार त्यांनी व्यक्त केले. हेच का भाजपाचे, संघाचे, भाजपाप्रणित रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संस्कार, असा सवाल ठाकरे यांनी केला.
-
संस्कार, संस्कृती आणि सुसंस्कृतपणा संपला तर हिंदुत्व कसले, असेही त्यांनी सुनावले. महागाई, बेरोजगारी आणि काश्मीरमधील दहशतवादावरून मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
-
काश्मीरमध्ये राहुल भटला जिथे मारले तिथे काय हनुमान चालिसा म्हणायची? हे काश्मार फाईलचे पुढचे पाऊल आहे काय? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
-
भाजपाचे हे हिंदुत्त्व म्हणजे भ्रमिष्ट करण्याचे हिंदुत्त्व असल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली. वाढलेले गॅसदर आणि गेल्या पाच वर्षांत दोन कोटी लोकांनी रोजगार गमावल्याच्या मुद्यांकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.
-
केंद्रीय यंत्रणाची भीती दाखवून लोकांना भाजपामध्ये प्रवेश दिला जातो, असा आरोप त्यांनी केला. सध्याची परिस्थिती लक्षात घेता आता हे दाऊदच्या मागे लागले आहेत. भाजपामध्ये प्रवेश करतो, असे दाऊद म्हणाला तर तो केंद्रात मंत्री म्हणूनही दिसेल, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी भाजपाला हाणला.
-
महाराष्ट्राला बदनाम करण्याचे भाजपाचे प्रयत्न बघून उद्वेग येतो. सुशांतसिंग प्रकरणापासून आतापर्यंत जे आरोप केले त्याचे पुढे काय झाले? आम्ही कधी तुमच्या कुटुंबाची निंदानालस्ती केली नाही. पण सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
एकतर्फी प्रेमातून जसा तरुणीवर अॅसिड हल्ला करून तिला विद्रुप केले जाते, तशाच प्रकारे महाराष्ट्रालाही विद्रुप करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
-
१० जूनला राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका होत असल्याने त्या दिवशी आयोजित केलेला आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा पुढे ढकलण्याची घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.
-
आदित्य ठाकरेंचा हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.
-
आता आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा १५ जून रोजी होईल, असे राऊत यांनी जाहीर केले.
-
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज, रविवारी गोरेगाव येथील सभागृहात सभा घेतली आहे. त्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, उद्या त्यांची सभा आहे, मग आम्ही परवा सभा घ्यायची का? हे असेच चालू ठेवायचे का? उद्या सभा आहे तर महागाईवर बोला, असा खोचक सल्लाही ठाकरे यांनी फडणवीस यांना दिला.
-
रवी राणा, नवनीत राणा, किरीट सोमय्या आणि ओवेसी यांच्यावर टीका करताना, भाजपाची अ, ब, क टीम आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यापैकी कोणाच्या हाती भोंगा द्यायचा. कुणाला औरंगजेबाच्या थडग्यावर पाठवायचे, हनुमान चालिसा बोलायला लावायचे आणि हे टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषदा घेणार, असं उद्धव ठाकरेंनी विचारलं.
-
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत समितीतून सर्वात प्रथम जनसंघवाले फुटले, असं मुख्यमंत्री म्हणाले.
-
शिवसेनेची पंचवीस वर्षे युतीमध्ये सडली. त्यानंतर यांचा हिंदुत्वाचा बुरखा फाटला आणि यांचा भेसूर चेहरा सर्वांना दिसला, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.
-
आम्ही काँग्रेससोबत जाऊनही हातातला भगवा सोडला नाही. आम्ही जे केले ते उघडपणे केले. पण तुमचा पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुरुंगात नव्हे तर भाजपवाल्यांच्या मांडीला मांडी लावून बसले असते, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
-
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन महाराष्ट्राला नको असताना मुंबईत जमीन पाहिजे असा आग्रह धरतात. मात्र मुंबई महानगर प्रदेशासाठी महत्त्वाच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी कांजुर मार्गची जागा केंद्र सरकार देत नाही, असंही उद्धव यांनी म्हटलंय.
-
सध्या एकाला बाळासाहेब झाल्यासारखे वाटते. ते बाळासाहेबांसारखी शाल घेऊन फिरतात, असा टोला नाव न घेता उद्धव यांनी राज ठाकरेंना लगवला.
-
कधी मराठीच्या नादी लागतात, तर कधी हिंदुत्वाचा नारा देतात. पण लगे रहो मुन्नाभाई चित्रपटातील मुन्नाभाईच्या डोक्यात जसा केमिकल लोच्या झाला होता तसा यांच्या डोक्यातही झाला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली.
