-
महागाई, बेरोजगारी, संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यात, अशा अनेक आघाड्यांवर राज्यातील विद्यमान शिंदे-फडणवीस सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे.
-
महाराष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान, राज्याच्या हितांचे रक्षण या सरकारकडून होऊ शकलं नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना ‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची धमक या सरकारमध्ये नाही, अशी टीका राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली. ते मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर बोलत होते.
-
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या महापुरुषांचा घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तींकडून सातत्याने अपमान होत आहे.
-
सीमाभागातील गावांकडून महाराष्ट्रबाहेर जाण्याची इतिहासात पहिल्यांदाच होत असलेली मागणी, मोठमोठे प्रकल्प राज्याबाहेर पळवल्याने नुकसान होत आहे.
-
त्याविरोधात १७ तारखेला मुंबईत जिजामाता उद्याने ते आझाद मैदानापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार. या मोर्चात सर्व महाराष्ट्र अभिमानी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.
-
राज्याच्या सीमाभागातील गावांनी महाराष्ट्राबाहेर जाण्याची मागणी करावी, असं यापूर्वी कधीही घडलं नव्हतं. यामागे कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे.
-
राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेऊनही, माध्यमांमध्ये तसे जाहीर करूनही राज्याचे दोन मंत्री मराठी भाषिक बेळगाव मध्ये जाऊ शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
-
महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावमध्ये बंदी कशी होऊ शकते आणि महाराष्ट्र सरकार हे कसं सहन करतं, हे समजत नाही, असेही अजित पवार म्हणाले.
-
नांदेडमधील देगलूर, सांगलीतील जत, सोलापुरातील अक्कलकोट, गुजरात सीमेलगतच्या नंदुरबार जिल्ह्यातील तसेच अन्य गावांसाठी महाविकास आघाडी सरकारने निधी उपलब्ध केला होता. त्या कामांना स्थगिती देण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकारने केलं आहे, असा आरोपही अजित पवारांनी केला.
Narendra Modi : दिल्लीतील स्फोटाच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “स्फोटाच्या घटनेत ज्यांनी…”