-
शिवसेनेला ५६ वर्षे झाली. ५६ वर्षातल्या बऱ्याच काही गोष्टी आजही मनात ताज्या आहेत. तो ५६ वर्षांपूर्वीचा शिवसेनेच्या स्थापनेचा तो क्षण. मी त्यावेळी जेमतेम सहा वर्षांचा होतो. माझ्यासमोर शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ शिवाजी महाराज की जय म्हणून फुटला होता.
-
५६ वर्षांच्या या वाटचालीत अनेक ज्ञात-अज्ञात शिवसैनिक ज्यांनी अक्षरशः रक्ताचं पाणी केलं, वार अंगावर झेलले. काही आपल्यात आजही आहेत अनेकजण निघून गेले. त्या सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करतो. त्यावेळी त्यांनी ते जर केलं नसतं तर आजचं आपलं वैभव आपण पाहू शकलो नसतो.
-
एक साधी गोष्ट आहे की शिवसेनेचा १९७१ मध्ये महापौर निवडून येणं हेच आपल्यासाठी फार मोठं वैभव होतं. त्यानंतर सलग गेले २५ वर्षे शिवसेना मुंबईवर मुंबईकरांच्या आशीर्वादाने राज्य करते आहे. यापुढेही करत राहिल. तेव्हा नगरसेवक निवडून येणं हे स्वप्न होतं. आज मुख्यमंत्री आपला आहे, आमदार आपला आहे, मंत्रिपदं आपल्याकडे आहेत.
-
स्वतःसाठी स्वप्नं बघणं हे सगळ्यांसाठी असतंच, पण दुसऱ्यांसाठी स्वप्नं बघणं आणि ती स्वप्न साकारण्यासाठी झटणं, यालाच शिवसैनिक म्हणतात. तो शिवसैनिक आजही या सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांच्यामध्ये जिवंत आहे. शिवसेना प्रमुखांनी त्यांना ज्या ज्या वेळी जी जबाबदारी सांगितली, मागे पुढे न पाहता त्यांनी त्यात उडी मारली. तसंच ती जबाबदारी यशस्वी करुन दाखवली. मग तो आणीबाणीचा काळ असेल, मार्मिकच्या छपाईला बंदी होती. कुणी मार्मिक छापायला तयार नव्हतं. तो छापून घेणं आणि अक्षरशः हातगाडीवर मार्मिक ठेवून बुक स्टॉलपर्यंत नेणं असो.
-
अशी ही आपली शिवसेना आज ५६ वर्षे पूर्ण करते आहे. नव्या दमाचे, सळसळत्या रक्ताचे सैनिक रोज येत आहेत. उद्याची निवडणूक आहेच. या निवडणुकीत मला पुन्हा तुम्हाला म्हणजे आपल्या आमदारांना काही मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही. पण आजचं हे जे चित्र आहे, आज आमदारांना आपण हॉटेलमध्ये आणलं आहे. जी काही बडदास्त ठेवायची ती ठेवली आहे. याला लोकशाही म्हणतात. आपलेच आमदार, आपलेच खासदार, आपले नगरसेवक यांना एकत्र ठेवणं ही आपली लोकशाही आहे. मला जे चित्र दिसतं आहे ते उद्याच्या म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या नंतर याच्याहून चांगल्या पद्धतीने दिसलं पाहिजे.
-
आज मुद्दामहून वर्धापन दिन थोडा वेगळ्या पद्धतीने साजरा करायचं ठरवलं. कारण आमदार, मंत्री आणि मी स्वतः मुख्यमंत्री म्हणजे आणखी पक्षाचं यश काय पाहिजे तुम्हाला? वरती (दिल्ली) आपले २२-२३ खासदार आहेत. त्याच्यातही वाढ होणार आहे. आणखी काय हवं? आपल्या दोन सभा एकदम दणदणीत झाल्या आहेत. जे काही बोलायचं होतं ते बरचसं बोललो आहे. तरीही बोलण्यासारखं बरंच आहे. पण सगळं आत्ता बोलणार नाही.
-
उद्या जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीची चिंता मला अजिबात नाही. कारण मी चिंता करत बसलो तर जे शिवसेना प्रमुखांनी माझ्या धमन्यांमध्ये भिनवलं आहे त्याचा उपयोग काय? हार-जीत होत असते. उद्या तर जिंकणारच आहोत, उद्याचा काही प्रश्नच नाही. कारण ठामपणाने मी सांगेन की राज्यसभा निवडणुकीत आपलं स्वतःचं एकही मत फुटलेलं नाही. फुटलं कोण? त्याचाही अंदाज लागला आहे. कुणी काय काय कलाकाऱ्या केल्या आहे ते पण कळलं आहे. त्याचा उलगडा होत जाईल. उद्या फाटाफुटीची मला चिंता अजिबात वाटत नाही. कारण शिवसेनेत गद्दार मनाचा कुणीही राहिलेला नाही.
-
मला या निमित्ताने शिवसेनाप्रमुखांची आठवण येते आहे. फाटाफुटीचं राजकारण आपण भरपूर पाहिलं आहे. भोगत आलो आहोत. कितीही फाटलं, फुटलं तरीही शिवसेना पहिल्यापेक्षा अधिक मजबुतीने उभी राहिली आहे. हे आपण इतिहासाला दाखवत आलो आहोत. मागे एकदा फाटाफूट झाली होती तेव्हा शिवसेनाप्रमुख त्यांच्या भाषेत बोलले होते, की मला आईचं दूध विकणारा नराधम माझ्या संघटनेत नको. हे वाक्य फार मोलाचं आहे. तो आज सुद्धा काय उद्या काय मला शिवसेनेत नको. कुठल्याही परिस्थितीत नाही. आजही अनेकजण असे आहेत की ज्यांनी शिवसेना मर-मर मरुन मोठी केली. त्यांना हे सगळं बघायला मिळालं नाही, भोगायला मिळालं नाही. आपल्याला हे वैभव बघायला मिळालं, भोगायला मिळालं. आपली ओळख निर्माण झाली ती शिवसेना या चार अक्षरांमुळे झाली.
-
आव्हानं येतात आणि जातात. काहीवेळा आव्हानं फार मोठी असतात, असं वाटतं की आता काय होणार? जो एक उल्लेख केला आणीबाणीचा, त्यावेळचं आव्हान तर फार मोठं होतं. जणूकाही शिवसेनेवर बंदी आलीच असंच वातावरण झालं होतं. अनेकांना वाटलं होतं की आजची आणि उद्याची रात्र शिवसेनेचे सगळे नेते अगदी शिवसेनाप्रमुखांसह हे तुरुंगात जातील. पण त्यावेळेलाही शिवसेना प्रमुखांनी आणि शिवसैनिकांनी धाडस दाखवलं. धाडसाला मरण नसतं. ज्याच्याकडे धाडस नसतं त्याला मरण्याशिवाय काहीही नसतं. धाडस हा आपला स्थायीभाव आहे आणि तो स्थायीभाव आपण सोडून चालणार नाही. मी तुम्हाला प्रवचन देत नाही पण हे सगळं गेल्या ५६ वर्षातलं अनुभवातलं बोलतो आहे. आणीबाणीसारखा काळ आपण पाहिला आहे. विरोधी पक्ष त्यावेळेला हतबल होता. आता तर आपण मजबूत आहोतच.
-
गर्व से कहो हम हिंदू है ही विश्व हिंदू परिषदेची घोषणा होती. पण बोलायला कुणीही तयार नव्हतं. हिंदू बोलणं हा गुन्हा समजला जात होता. तेव्हा हिंदुत्वाचा नारा बुलंद केला तो फक्त शिवसेनाप्रमुखांनी आणि शिवसेनेने. त्यामुळेच या गोष्टी होत आहेत. आज जे काही चाललं आहे ते त्यांच्यासाठी हिंदुत्व असेल पण माझ्यासाठी ते हिंदुत्व नाही.
-
हृदयात राम आणि हाताला नाही काम आज तेच चित्र देशात दिसतं आहे. हृदयात राम आहेच. पण हातात काम नसेल तर नुसतं राम-राम म्हणून काही उपयोग होणार नाही. तुम्ही एका बाजूला मंदिराची उद्घाटनं करत आहात. पण हे करुन जर एकतर्फी चालणार असेल तर काय उपयोग? नोटाबंदी झाली तेव्हा लोकांमध्ये थोडं भयही होतं. तेव्हा हू की चू कुणी केलं नाही. नोटाबंदीचा निर्णय पचून गेला. त्यानंतर शेतकऱ्यांचा विषय आला. शेतकरी कायदे आल्यानंतर शेतकऱ्यांनी आधी धाडस दाखवलं, रस्त्यावर उतरले. त्या आंदोलनात अनेक जण गेले, वारले. पण शेतकरी जो हटून बसला तो मागे हटला नाही. त्यानंतर सरकारने एक पाऊल मागे घेतलं.
-
एक तर वचनं अशी द्यायला हवी जी आपण पूर्ण करु शकू. शिवसेना आजपर्यंत का टिकून राहिली? का शिवसेना त्याच दमाने का पुढे जाते आहे? कारण शिवसेनेने आजपर्यंत एक सुद्धा अशी गोष्ट केलेली नाही जी की बोलली आणि केली नाही. जे वचन दिलं ते शिवसेनेने पाळलं. दोन कोटी नोकऱ्या देऊ, पाच वर्षात हे करु दिलं काय काहीच नाही. मग अचानक एखादी योजना आणायची आणि त्याला नाव मोठं द्यायचं. जी धोरणं आखणार आहात ती धोरणं माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी, माझ्या पुढच्या पिढीसाठी चांगली ठरतील हा विश्वास वाटल्याने तुम्हाला निवडून दिलं ना? मत दिल्यानंतर हे असं होणार असेल तर याला काय अर्थ आहे? उद्या जर शिकली सवरलेली पोरं अंगावर आली तर झेलणार कोण? हा जो काही कारभार चालला आहे हे मी सांगतोय तु्म्हाला वाटेल उद्याच्या निवडणुकीचा काय संबंध? तर तो नक्कीच आहे. कारण उद्याची निवडणूक ही सुद्धा ही आमच्यात फूट पडणार नाही हे दाखवणारी असेल.
-
तुम्ही देशात जरी काही केलंत तरीही महाराष्ट्र हा वेगळा विचार करु शकतो, करतो. महाराष्ट्राने वेगळा विचार करुन दाखवला आहे हे आपल्याला उद्याला देशाला दाखवायचं आहे. नुसतं सत्तेपुढे शहापण चालत नाही हे ठीक आहे. पण महाराष्ट्रातली जी शहाणी जनता आहे त्या महाराष्ट्रातल्या शहाण्या जनतेपुढे सत्तेचा माज चालत नाही, तो आम्ही चालू देत नाही. हे सांगणारी उद्याची निवडणूक असेल.
-
सत्तेपुढे शहाणपण चालणार नसेल तर शहाणं व्हायचं कशाला? जा सगळे भाजपात जा आणि सत्तेचा माज करा. किती दिवस चालणार? मला पर्याय नाही असं अजिबात होत नाही. प्रत्येकाला पर्याय असतो आणि हा पर्याय हा पहिल्यापेक्षा शेराला सव्वाशेर असतो. त्यामुळे जो शेर आहे त्यानेही लक्षात ठेवलं पाहिजे की आज मी शेर आहे पण उद्या कुणीतरी सव्वा शेर येणार आहे.
-
महाराष्ट्राचं पेटणं वेगळं असतं. महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवरायांचे मावळे जरी आपण झालो तरीही फार मोठं झालं. त्यावेळीही महाराष्ट्राने दाखवलं होतं की हिंदुस्थानावर हिरवा वरवंटा येत असताना त्या वरवंट्याच्या चिंधड्या उडवल्या त्या छत्रपती शिवरायांच्या रुपाने. आजही तीच परंपरा आपण घेऊन चाललो आहोत.
-
आपल्या ५६ वर्षांचं यश हेच आहे. माणसं तुटतात, दुखवातात ती आपली नसतातच. ते असेच कुणीतरी घुसलेले असतात. पण जी माणसं जेव्हा संधी मिळेल त्या संधीचं सोनं करतात आणि नाही म्हटलं तरीही पुढच्या संधीची वाट बघतात. आज आपली ५६ वर्षे पूर्ण झाली आहेत. अब तक ५६ आणि पुढची १५६ वर्षे त्यापुढची २५६ वर्षे असा पाढा म्हणत आपण पुढे जाणार आहोत. यशाची कमान पुढे जाओ अशी आशा व्यक्त करतो आणि तुमचे आभार मानतो.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”