-
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करुन सर्वांनाच धक्का दिला. क्रिकेटबरोबर धोनीचे व्यक्तीगत आयुष्यही नेहमीच चर्चेत राहिले आहे. मागच्या महिन्यातच एमएस धोनी आणि साक्षी यांच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाली. डेहराडूनमध्ये चार जुलै २०१० रोजी धोनी आणि साक्षी विवाहबद्ध झाले. (फोटो सौजन्य – एमएमस धोनी / साक्षी धोनी इन्स्टाग्राम)
-
लग्न झाल्यापासूनच साक्षीने धोनीला त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रवासात खंबीर साथ दिली. धोनी आणि साक्षीचा विवाह संपूर्ण देशासाठीच आश्चर्याचा धक्का होता. कारण कोणाला काही कळू न देता अत्यंत गुपचूपपणे साध्या पद्धतीने हा विवाह करण्यात आला.
-
लग्नानंतर पाच वर्षांनी सहा फेब्रुवारी २०१५ रोजी साक्षीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. धोनी आणि साक्षी दोघे आई-बाबा बनले. झिवा असे त्यांच्या मुलीचे नाव आहे.
-
साक्षी आणि धोनी दोघे परस्परांना लहानपणापासून ओळखत होते. पण त्यावेळी ते प्रेमात पडले नाहीत. योग्य वयात आल्यानंतरच त्यांचा प्रेमाचा सूर जुळला. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार धोनी आणि साक्षीचे वडिल एकाच कंपनीत नोकरीला होते.
-
धोनी आणि साक्षी परस्परांच्या संपर्कात नव्हते. पण २००७ साली कोलकात्ताच्या ताज बेंगाल हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली आणि त्यानंतर त्यांच्यात प्रेमात नाते फुलत गेले. औरंगाबादमधून हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतल्यानंतर साक्षी कोलकात्त्यातील हॉटेलमध्ये इंटर्नशिप करत होती.
-
करोना व्हायरसच्या संकटामुळे धोनी आणि साक्षीने त्यांच्या लग्नाचा दहावा वाढदिवस रांची येथील त्यांच्या फार्महाऊसवर साजरा केला. लॉकडाउनच्या या काळात धोनी आणि साक्षी रांची येथील आलिशान फॉर्महाऊसवर एकत्र वेळ घालवत होते.
-
धोनीच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावरुन लग्नाच्या दहाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचा विवाह कसा सगळयांसाठी आश्चर्याचा धक्का होता त्या आठवणी सुद्धा जागवल्या.
-
धोनीच्या लग्नाला फार कमी निवडक पाहुणे उपस्थित होते. यामध्ये बॉलिवूडमधला धोनीचा मित्र जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू सुद्धा लग्नाला हजर होते असे इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.
-
"दहा वर्ष एकत्र चालणे हे टीमवर्क आहे. प्रगतीसाठी आम्ही दोघांनी एकमेकांना मोकळीक दिली त्यातून आम्ही अधिक परिपक्व झालो. त्यावेळी आम्हाला दोघांना परस्परांची प्रचंड ओढ होती. म्हणून अधिक जवळ आलो. चांगल्या-वाईट काळात परस्परांना साथ देत राहिलो, त्यामुळे आम्हाला प्रेमाची जादू कळली" असे साक्षीने म्हटले होते.
-
"आज आम्ही हा दिवस साजरा करतोय, त्यासाठी पालक, भावंडं , नातेवाईक आणि मित्रपरिवाराचे कृतज्ञ आहोत. आमच्यावर प्रेम करणाऱ्या, काळजी घेणाऱ्या मित्रांची उणीव आम्हाला प्रकर्षाने जाणवतेय. ज्यांनी नेहमीच आम्हाला खंबीर साथ दिली आहे" साक्षीने लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या इन्स्टाग्रामवर हा मेसेज पोस्ट करत सर्वांचे आभार मानले होते.

“पाकिस्तानला शिक्षा गरजेची होती”, बुमराहच्या ‘जेट क्रॅश’ सेलिब्रेशनवर केंद्रीय मंत्र्यांची प्रतिक्रिया