पुणे : पुणे-मुंबई दरम्यान बुधवारी (७ ऑगस्ट) धावणाऱ्या सर्व रेल्वे गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्यासह मुंबईमध्ये गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर खबरदारी म्हणून पुणे-मुंबई धावणाऱ्या डेक्कन क्वीन, इंटरसिटी, सिंहगड आणि इंद्रायणी एक्स्प्रेस या गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्यातून मुंबईकडे या गाडय़ा रवाना न झाल्याने मुंबईतूनही या गाडय़ा सुटणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे, मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी रेल्वे रूळ पाण्याखाली गेले आहेत. काही रेल्वे स्थानकांमध्येही पाणी साचले आहे. या परिस्थितीत गाडय़ा सोडणे धोक्याचे ठरू शकते, त्यामुळे रेल्वे प्रशासनाने दोन्ही बाजूने गाडय़ा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच बुधवारी (७ ऑगस्ट) पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेस आणि शुक्रवारी (९ ऑगस्ट) एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेस या गाडय़ाही रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी पुणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती. मात्र, सकाळच्या सत्रातील पुण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या सर्वच गाडय़ा रद्द करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यामुळे अनेकांना एसटी गाडय़ा, खासगी वाहनांनी प्रवास करावा लागला.
सांगली, कोल्हापूर, कोकण मार्गावरील एसटी गाडय़ा रद्द
मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर येऊन राज्य, राष्ट्रीय महामार्गावरील अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. परिणामी खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यातून सांगली, कोल्हापूर, कोकणात जाणाऱ्या एसटी गाडय़ा रद्द करण्यात आल्या. तसेच मुळशी तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्याने या तालुक्यातील काही एसटी गाडय़ांच्या फेऱ्याही सलग दुसऱ्या दिवशी रद्द करण्यात आल्या.
पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक सुरळीत
पुणे-मुंबई मार्गावरील गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झालेली रस्ते वाहतूक मंगळवारी सुरळीत झाली. पुण्याहून ठाणे, बोरिवली आणि दादरसाठी रवाना झालेल्या गाडय़ा, तसेच ठाणे, बोरिवली, दादर येथून पुण्यासाठी रवाना झालेल्या एसटी गाडय़ा विहित कालावधीत दाखल आल्या. रेल्वे गाडय़ा रद्द झाल्याने एसटी गाडय़ांना गर्दी वाढली होती. त्यामुळे प्रवाशांच्या मागणीनुसार पुण्यातून मुंबईकडे जादा गाडय़ा सोडण्यात आल्या.