पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सूचना

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड असो की महाराष्ट्रात कुठेही, पुराचे पाणी नागरी वस्तीत येणारी निश्चित ठिकाणे आहेत. तेथे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पिंपरीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. पिंपरी-चिंचवडमध्ये नागरी वस्तीत वारंवार पुराचे पाणी शिरत असल्यास त्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारणे यासारखे उपाय करावेत, अशी सूचनाही त्यांनी दिली.

सांगवी, पिंपळे निलख येथील पूरग्रस्त भागाला चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली आणि नागरिकांची विचारपूस केली. यावेळी कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे, महापौर राहुल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आदी त्यांच्यासमवेत होते.

पाटील म्हणाले की, दरवर्षी जर ठराविक भागात पुराचे पाणी येत असेल आणि नागरी वस्तीत त्या पाण्याचा शिरकाव होत असल्यास त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना केली पाहिजे.

शक्य त्या ठिकाणी संरक्षण भिंत उभी केली पाहिजे. पूरबाधितांना सर्वप्रथम सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले पाहिजे. त्या ठिकाणी आवश्यक सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत. पाणी ओसरल्यानंतर हे नागरिक आपल्या घरी जातील, तेव्हा ज्यांचे नुकसान झाले, अशांच्या घरांचे पंचनामे केले पाहिजेत. वारंवार पाणी येणाऱ्या भागात आवश्यक उपाययोजना केली पाहिजे, जेणेकरून नागरिकांना पुन्हा-पुन्हा त्याच समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

 

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Finding precise places of flood for taking permanent measures chandrakant patil zws