पूर्वी अरुण म्हात्रे, सौमित्र, अशोक नायगावकर, महेश केळुसकर, हे गावोगावी खेड्यापाड्यात जाऊन कवितांचे कार्यक्रम करत असत. कविता रुजावी ती बहरावी या साठी पाडगावकर, इंदीरा संत, बहिणाबाई, वसंत बापट, शांता शेळके, सुरेश भट अशा अनेकांनी आपल आयुष्य झोकून दिलं. पण आत्ताच्या पिढीत कविता हा विषय कॅज्युअल झालाय.
लॉकडाऊननंतर रस्त्यांवरची गर्दी हळूहळू पूर्वपदावर आली. शांततेच्या गुंगीत हरवलेल हे शहर हळूहळू शुद्धीत म्हणजेच पूर्वपदावर आलं. सुरूवातीला थेटरमध्ये बसताना एक सिट सोडून बसाव लागत होत. सुरूवातीला कार्यक्रमाला तुरळक लोक येत होती. मग ही गर्दी वाढू लागली. त्यात आत्ताची पिढी जरा निर्भीड.
या पिढीचा धागा म्हणजे आपला दोस्त. करोना काळात कुणी नाही आलं, पण आपला हक्काचा मित्रच धाऊन आला. प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या हक्काचा एक तरी दोस्त असतो आणि हा दोस्त नेहमी आपल्या चांगल्यासाठी काही ना काही सांगत असतो. अशातच महाराष्ट्रातील काही तरुण कवींनी एकत्र येऊन कविता, चित्र आणि कथांचा एक कार्यक्रम गुंफलाय. त्याच नाव आहे दोस्त म्हणतो. ही तरुण कवी मंडळी गेली ८ वर्षे ते गावागावात, खेड्यापाड्यात जाऊन या कार्यक्रमाच्या माध्यमातून कविता पोहोचवण्याच काम अविरथपणे करतायत.
रोहन कोळी याचे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथून शिक्षण पूर्ण झाले असून नैपथ्याची जबाबदारी पार पाडत आहे.
या भयाण कातरवेळी मी कुणास स्मरतो आहे,
घर रांगोळीने सजले पण रंग उतरतो आहे…
या लाख दिव्यांच्या माळा, ही खोटी आतीशबाजी,
हा देश उजळतो आहे की आतून जळतो आहे…
अमोल…
अस लिहीणारा अमोल शिंदे यांने मुंबई युनिव्हर्सिटीतून लोककलेच शिक्षण घेतले असून कवीता गाऊन सादर करण ही त्याची विशेष ओळख आहे. नाशिक येथे पार पडलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तो निमंत्रित कवी म्हणून उपस्थित होता.
साकव म्हणजे नदीचा प्रियकर..
साकव वाहून गेल्याचं ऐकलंय कधी?ऐकलं असाल तर
वाहून जाण्याविषयी
एक सुंदर कविता ऐकलेय तुम्ही..
- विजय बेंद्रे
विजय बेंद्रे म्हणजे पुस्तकांच्या जगातला दिलदार माणूस, स्ट्रीट लायब्ररी या ऊपक्रमा द्वारे त्याने जुन्या पुस्तकांना आणी वाचकांना एकत्र आणण्याच काम केलय.
प्रिय नदी,
तुझा उगम मला माहीत नाही
आणि तुझा शेवटही
पण तू वाहत आलीस माझ्या शुष्क मुळापर्यंत
मी वचन देतो
माझी सगळी फुलं तुझ्या पाण्यात पडतील…
-इंद्रजित
अस लिहीणारा इंद्रजीत उगले हा बीड चा असून तरूण गझलकार म्हणून त्याची महाराष्ट्रात ओळख आहे.
खोटा-खरा काळा-गोरा
दु:खालाही असला पाहिजे ,
एखादा चेहरा.
-मेघांत
प्रविण खांबल म्हणजेच मेघांत यानेच या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली असून परिस्थितीवर परखड भाष्य करणारा कवी म्हणून त्याची ओळख आहे.
भिंतींना या विश्वातील प्रत्येक भाषा आहे अवगत
प्रत्येक शब्दांमध्ये भिंती उभ्या आहेत फार पूर्वीपासून
जेव्हा चित्रभाषा होती अगदी तेव्हापासून
माणसांना भिंतींवर लिहिण्याचा
मोह आवरता येणार नाही
कारण या विश्वातील पहिली भाषा
भिंतींनी समजून घेतली
मग माणसाने माणसाला समजावली
-नारायण टिकम
अस लिहीणारा नवोदित कवी नारायण टिकम हा ही या कार्यक्रमात सहभागी आहे.
आकाश सावंत हा प्रसिद्ध तरूण गझलकार असून तो आणी संकेत जाधव या कार्यक्रमाची जबाबदारी ऊत्तम रित्या पार पाडत आहेत.
या दुनियेच्या लाटांवरती
बांधू आपुली नविन वस्ती…
असं म्हणत गावोगावी “दोस्त म्हणतो” या नावाने कविता सादर करण्याचा हा अनोखा उपक्रम आता पुणे येथे होणार आहे. मित्रांनी मित्रांसाठी सुरु केलेला हा कवितांचा प्रवास गावोगावी रसिकांच्या मनात घर करुन आहे. येत्या 15, ऑक्टोबर संध्याकाळी 6 वा सुदर्शन रंगमंच पुणे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चित्र, कविता, गप्पा या वेगळ्या शैलीत पुन्हा एकदा दोस्त म्हणतो आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. करोना नंतर महाराष्ट्रातील या नामवंत तरूण कवींचा कार्यक्रम म्हणजे पुणेकर रसिकांसाठी साहित्याची मेजवानीच आहे.