डॉ. आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कराड शाखेला भेट दिली होती, असा दावा केला जात आहे. ९ जानेवारी १९४० रोजी केसरी वृत्तपत्रात आलेल्या बातमीचा संदर्भ यासाठी दिला जात आहे. मागचा-पुढचा संदर्भ तोडून एखाद्या घटनेचं राजकीयीकरण करण्याची संघाची ही पहिली वेळ नाही. मात्र डॉ. आंबेडकर यांच्या बाबतीत तत्कालीन वर्तमानपत्रांनी अनेकदा खोट्या बातम्या दिल्याचे आढळते. ‘कुलाबा समाचार’ या वर्तमानपत्राने महाड सत्याग्रहाच्या वेळी ‘आंबेडकरांची रायगडावर स्वारी, आंबेडकरांच्या रायगडावरील लीला’ असा मथळा केला होता. बातमीत असे मांडण्यात आले होते की आंबेडकर गडावर गेले असता ते शिवाजी महाराजांच्या गादीवर बसले. त्यांनी समाधीची विटंबना केली. ही पूर्णत: खोटी बातमी होती. डॉ. आंबेडकर रीतसर मोबदला द्यायला तयार असूनसुद्धा १९२० साली ‘मूकनायक’ या वर्तमानपत्राची जाहिरात छापायला केसरी व्यवस्थापनाने नकार दिला होता. केसरीच्या या दुटप्पी व्यवहाराला उघडे पाडणाऱ्या बातम्या नंतर ‘बहिष्कृत भारत’च्या अंकात छापून आल्या होत्या. त्यामुळे आज दावा केली जात असलेली केसरीमधील बातमी किती विश्वासार्ह आहे, हा प्रश्न आहे. आंबेडकरांच्या संदर्भात तत्कालीन बातम्या पुस्तक रूपात संग्रहित करण्यात आलेल्या आहेत. त्यात १९४० साली आंबेडकरांनी सातारा, सांगली, बेळगाव असा प्रवास केल्याची नोंद आढळते. परंतु कराडच्या संघ शाखेला भेट दिल्याची कुठेच नोंद नाही. १९२० ते १९४० च्या दरम्यान डॉ. आंबेडकर अनेक वेळा सार्वजनिक कार्यक्रमासाठी पुण्यात आले. पण त्याची दाखल केसरीने कधीच घेतली नाही. त्या काळातील दलितांचे महत्त्वाचे नेते शिवराम जानबा कांबळे यांच्या मृत्यूची साधी एका ओळीची बातमी केसरीने छापली नाही. अशा परिस्थितीत कराडची बातमी शंकास्पद वाटते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा