भारतात दर्जेदार उच्च शिक्षण सर्वासाठी सहजसाध्य नाही हे खरेच, पण मिळवलेल्या पदवीमुळे अधिक चांगले जीवनमान मिळू शकत नाही, ही वस्तुस्थिती दाहक..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या पाल्याला काय जमेल, किंवा काय नक्की जमणार नाही, याचा विचारही न करता, अनेक जण ज्या मार्गाने चालले आहेत, तोच मार्ग निवडण्याची पालकांची सवय आता किमान तीन दशके जुनी झाली आहे. फरक इतकाच की ३०-४० वर्षांपूर्वी ‘कॉमर्स घे, बँकेत नोकरी मिळवशील’ असे ऐकावे लागलेल्या या पालकांची गाडी आपल्या पाल्यासाठी बहुतेक वेळा डॉक्टर आणि इंजिनीअर या दोन व्यवसायांशी संबंधित शिक्षणापाशी येऊन थांबते, हेही गेल्या तीन दशकांतले वास्तव. त्यामुळेच वैद्यकीय वा अभियांत्रिकीच्या सामायिक प्रवेश परीक्षांत हमखास गुण मिळवण्याची जाहिरात करणाऱ्या शिकवणी वर्गाचे पेव फुटले. पण अभियांत्रिकीची ‘जेईई’ किंवा वैद्यकीय प्रवेशांची ‘नीट’ या परीक्षा पार केल्या तरीही पुढले निर्णय विद्यार्थ्यांना घ्यावे लागतात. वैद्यकीय पदवीलाच व्यवसाय करण्याएवढी तरी किंमत एके काळी असे. आता त्यातही विशेष प्रावीण्याला महत्त्व आल्याने एमबीबीएसनंतर काय, हा प्रश्न असतो. अभियांत्रिकी या एका शब्दात तर अनेक विद्याशाखा अडकलेल्या असल्याने पुन्हा काय करावे, हा यक्षप्रश्न उभा राहतोच. सर्वाना ‘आयआयटी’- राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्था- हवी असते. मुळात ‘जेईई मेन’ परीक्षा असो की एकेका ठिकाणच्या आयआयटीसाठी जेईई अ‍ॅडव्हान्स्डसारखी परीक्षा- येथे लाखो मुलामुलींमधून काही हजार मुलांना यश मिळते, तेव्हा त्यांनी काही ना काही ध्येय ठरवलेले असणारच, असे मानण्यास जागा आहे. पण अमुक ठिकाणची आयआयटीच हवी म्हणून मन मारून संगणकशास्त्राऐवजी काही जण स्थापत्य अथवा यंत्र- अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम निवडतात. असेही करून पुढे काय होते? ‘‘आयआयटीमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी जीवनात मात्र भलत्याच क्षेत्रात शिरतात, ही एका अर्थाने राष्ट्रीय हानी आहे,’’ असे मत मद्रासच्या आयआयटीचे संचालक डॉ. के. कामकोटी यांनी नुकतेच व्यक्त केले. मुंबईसह अनेक आयआयटींचे ‘जेईई अ‍ॅडव्हान्स्ड’ परीक्षांचे निकाल रविवारी, १८ रोजी जाहीर होणार असताना डॉ. कामकोटी यांचे मत चिंतनीय ठरते.

जे शिक्षण घेतले, त्याचा उपयोग न करता भलत्याच क्षेत्रात प्रवेश केल्याने, अशा विद्यार्थ्यांनी आयआयटीसारख्या संस्थेतील एक प्रवेश अनुपयोगी ठरवला, असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ. अशा उच्च शिक्षणसंस्थेतून ज्ञान संपादन केल्यानंतर भलत्याच क्षेत्रात काम करण्याने त्या ज्ञानाचा नेमका काय उपयोग, असाही त्याचा एक तर्क काढता येऊ शकेल. या तर्काची चर्चा गेली अनेक वर्षे सुरू आहे. आधीच उच्च शिक्षणसंस्थात प्रवेश मिळणे कठीण असताना, मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग त्याच क्षेत्रात न करणे गैर आहे, असा या तर्काचा पुढील भाग. शिवाय यंत्र अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम आयआयटीत शिकलेली विद्यार्थिनी पुढे विमानोड्डाण क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासकम पूर्ण करू शकते. देशाला अशा अभ्यासक्रमांचा उपयोगच होत असतो. याउलट यंत्र-अभियांत्रिकीनंतर कोणी मार्केटिंग अथवा फायनान्स मॅनेजमेंटच्या क्षेत्रात जाणार असेल तर आयआयटीचे शिक्षण वाया गेले, असेही डॉ. कामकोटी यांचे म्हणणे.

पण मुळात जे शिकायचे त्याच क्षेत्रातील व्यवसाय निवडावा, अशी आवश्यकता देशाला निर्माण झाली तीच दर्जेदार उच्च शिक्षणाच्या मुबलक संधी नसल्यामुळे. शिक्षणाचा असलेला रोजगाराशी संबंध ही तर भारतीय शिक्षणव्यवस्थेपुढील सर्वात मोठी अडचण आहे. रोजगाराच्याही पुरेशा संधी नसल्यामुळे हे घडते, हे तर खरेच. परंतु घेतलेले शिक्षण आणि त्यातून मिळालेले ज्ञान कधीच वाया जात नाही, हेही तेवढेच खरे. आयआयटीमधून उत्तीर्ण झालेल्या कित्येकांनी नंतर स्पर्धा परीक्षेत प्रावीण्य प्राप्त केले आणि ते प्रशासनात वरच्या पदापर्यंत पोहोचले. वैद्यकीय पदवी घेतलेलेही कित्येक जण आज सरकारी अधिकारी म्हणून उत्तम काम करीत आहेत. ते करीत असलेल्या कामात त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा फायदा होत नाही, असे म्हणणे वावगेपणाचेच ठरेल. डॉक्टर झाल्यानंतर अभिनय क्षेत्रात आलेल्या अभिनेत्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाची ती एक जागा वाया घालवली, असे मानण्याचे कारण एक डॉक्टर कमी झाला एवढेच असते. प्रत्यक्षात त्या क्षेत्रातही ज्ञान उपयोगी पडतच असते. त्यामुळे शिक्षण घेतल्यानंतर त्याच क्षेत्रात काम करीत राहणे अधिक उपयुक्त ठरणारे आहे, या डॉ. कामकोटी यांच्या विधानाचा प्रतिवाद अनेक पातळय़ांवर करता येऊ शकतोच. भारतातील शिक्षण सर्वासाठी सहजसाध्य नाही, ही त्यामागील खंत समजून घेत असतानाच, मिळवलेल्या पदवीमुळे अधिक चांगले जीवनमान मिळू शकत नाही, ही वस्तुस्थितीही समजून घ्यायला हवी. जगण्याच्या अनेक क्षेत्रांत बहुविध ज्ञानांच्या शाखांचे एकत्रीकरण अतिशय उपयोगाचे ठरू शकते. त्या क्षेत्रात असे उच्चशिक्षित पोहोचले, तर ती क्षेत्रेही उजळण्याची शक्यता वाढते. अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, अध्यापन, माध्यमे यांसारखी क्षेत्रे अनेक विद्याशाखांना सामावून घेणारी असतात. अधिक शुल्क भरून किंवा प्रवेश परीक्षेसाठी अतिरेकी परिश्रम घेऊन प्रवेश मिळवणे हेच जिथे जिकिरीचे ठरते, तेथे ज्ञानाच्या सर्वागीण वापरासाठी विरोध होण्याची खरे तर आवश्यकता नाही.

डॉ. कामकोटी यांच्या मते आताच्या युवकांना घरी बसून काम करणे अधिक आवडते. त्यामध्ये स्वातंत्र्यही मिळते आणि घरातील कामांबरोबरच अन्य छंदही जोपासता येतात, असे त्यांचे म्हणणे. उच्च पदवी म्हणजे अधिक पगार ही पद्धत खोलवर रुजल्यामुळे शिक्षणाची उपयोगिता केवळ अर्थार्जनापुरतीच मर्यादित असते, हा समज दृढ होण्यास मदत झाली. अधिक पैसे म्हणजे अधिक ऐषाराम हाही या समजाचा एक महत्त्वाचा घटक. प्रत्यक्षात समाधान या गोष्टीकडे मात्र त्यामुळे दुर्लक्ष होत राहते. शिक्षणामुळे नजर विस्फारत असेलच, तर हे समाधान केवळ अधिक उत्पन्नातूनच मिळते, हा समज दूर व्हायला हवा. प्रत्यक्षात समाधानापेक्षा समाजातील प्रतिष्ठेला अधिक महत्त्व मिळत गेल्याने, टर्नर, फिटर, प्लंबर, सुतार, लोहार, संगणक दुरुस्ती यांसारख्या जगण्याच्या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांची अधिक अडचण होते.

शिक्षणाचा हेतू सुदृढ समाजनिर्मिती असा असला, तर पदवी आणि करीत असलेले काम यांचा अन्योन्यसंबंध जोडण्याची गरजही नाही. एक अभियंता किंवा डॉक्टर होण्यासाठी होणारा प्रचंड खर्च लक्षात घेता अशी पदवी घेणाऱ्याने शक्यतो तोच व्यवसाय करावा, अशी समाजाची मागणी असते. मुळात प्रवेशाची संख्या कमी, त्यातच खासगी ठिकाणी न परवडणारे शुल्क, अशी अडचणींची चळत पार करून तेथपर्यंत पोहोचलेल्यांनी निदान त्या पदवीचा उपयोग त्याच क्षेत्रात न करणे म्हणजे एक प्रवेश आणि त्यावरील खर्च वाया जाण्यासारखे आहे, असे म्हणणे एका बाजूला रास्त, तर दुसऱ्या बाजूला ज्ञान आणि क्षेत्र यांची गल्लत करू नये, अशी मागणी अधिक योग्य.   शिक्षणाचा जगण्याशी थेट संबंध रोजगाराशी जोडला गेल्यामुळे या प्रकारच्या वाद-प्रतिवादांना व्यासपीठ मिळते. त्यातून टीका आणि प्रतिटीका होत राहते. नोकरीयोग्य शिक्षण घेतलेल्या कोटय़वधींना नोकरी मिळत नाही आणि घेतलेल्या शिक्षणाचा काहीच उपयोग होत नाही, अशा सामाजिक अवस्थेत शिक्षणाचा सामाजिक प्रतिष्ठेशी असलेला संबंध जोवर तुटत नाही, तोवर या वादचर्चा सुरूच राहतील आणि आयआयटीतलेच नव्हे, अनेक प्रवेश त्या-त्या संस्थांच्या संचालकांना वायाच गेल्यासारखे वाटत राहतील.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iit madras dr director v kamakoti concerned over engineering students for non engineering career zws