कल्याण – कल्याण ते छत्रपती शिवाजी टर्मिनस या कल्याण रेल्वे स्थानकातून सकाळी ८.५४ वाजता सुटणाऱ्या अति जलद वातानुकूलन लोकलमधील ७०५२ सी या डब्यातील वातानुकूलन यंत्रणा गेल्या दोन दिवसांपासून (सोमवार, मंंगळवार) बंद आहे. या डब्यातील वातानुकूलन यंत्रणेची देखभाल तातडीने करावी म्हणून प्रवासी रेल्वे प्रशासनाला एक्सच्या (ट्विटर), तक्रारीच्या माध्यमांतून कळवित आहेत, त्याची दखल रेल्वे प्रशासनाकडून घेतली जात नसल्याच्या तक्रारी प्रवाशांंनी मंगळावारी केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वातानुकूलन यंत्रणा बंद आणि त्यात मंंगळवारी सकाळी डब्यात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्याने बहुतांशी प्रवाशांना गुदमरल्याचा त्रास होऊ लागला. हा त्रास असह्य झाल्याने ७०५२ सी डब्यातील एक महिला अस्वस्थ होऊन डब्यात कोसळली. तिला चक्कर आल्याने इतर प्रवाशांनी त्यांना प्रथमोपचार करून सावध केले. वातानुकूलन यंत्रणा सुरू करण्याचे प्रयत्न करण्याऐवजी प्रवाशांंमुळे वातानुकूलन लोकलचे दरवाजे लागत नाहीत. त्यामुळे लोकल सुटण्यास विलंब होतो, या विचारातून मंगळवारी सकाळी कल्याण रेल्वे स्थानकात वातानुकूलन लोकलमधून प्रवास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि लोकलच्या उघड्या दरवाजाजवळ उभ्या असलेल्या दोन सामान्य प्रवाशांना रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी पकडून कारवाईसाठी जबरदस्तीने घेऊन गेले. आमची काहीही चूक नसताना तुम्ही आम्हाला का पकडले आहे, असे ते दोन प्रवासी प्रश्न विचारत होते, जवान त्यांचे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. जवानांच्या या कृतीविषयी प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.

हेही वाचा – ठाण्यातील सेंट्रल पार्ककडे पर्यटकांचा ओढा, पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा

प्रवाशांची हैराणी

कल्याण रेल्वे स्थानकातून सकाळी ८.५४ वाजता सीएसएमटीकडे जाणारी वातानुकूल अति जलद सुटते. उकाड्याचे दिवस असल्याने आणि कार्यालयीन वेळेत ही लोकल मुंबईत पोहचत असल्याने प्रवाशांची सर्वाधिक पसंती या लोकलला आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकातील अनेक प्रवासी या वातानुकूलन लोकलमधून उलटा प्रवास करत कल्याणला जातात आणि तेथून पुन्हा मुंबईचा प्रवास सुरू करतात. कल्याण-सीएसएमटी सकाळच्या ८.५४ लोकलच्या ७०५२ सी डब्यातील वातानुकूलन यंत्रणा सोमवारपासून बंंद आहे. ही यंंत्रणा सुरू करावी म्हणून प्रवाशांनी दोन दिवसांपासून रेल्वे प्रशासनाला कळविले आहे. डब्यातील वातानुकूलन यंत्रणा बंद असेल तर प्रत्येक डब्यात लाल कळ आहे. ही कळ प्रवासी सतत दाबत असल्याने मोटरमनने ती दोन दिवसापासून बंद केली आहे, असे प्रवाशांनी सांगितले.

वातानुकूलन डब्यात तिकीट तपासणीस नाहीत. देखभाल कर्मचारी आले तर त्यांनी वातानुकूल यंत्रणा सुरू न करता दिशाभूल करणारी माहिती प्रवाशांंना दिली. वातानुकूलन लोकलला प्रवाशांंची सर्वाधिक पसंती आहे. चढ्या दराचा रेल्वे पास काढून आम्ही प्रवास करतो, मग रेल्वे आमच्या तक्रारींची दखल का घेत नाही, असे प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत.

हेही वाचा – ठाणे : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज, ४ हजार जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई, १५५ अवैध शस्त्र जप्त

वातानुकूलन लोकलमधील यंत्रणा सुस्थितीत आहे की नाही हे दररोज पाहणे रेल्वेचे काम आहे. ही यंत्रणा बंद असेल तर लोकलचे दरवाजे उघडे ठेऊन लोकल चालवावी, पण त्यालाही रेल्वे तयार होत नाही म्हणजे प्रवाशांनी गुदमरत प्रवास करायचा का. प्रवाशांच्या जिवाला काही झाले तर त्याची जबाबदारी रेल्वे प्रशासन उचलेल का? – श्रीरंग परांजपे, प्रवासी.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air conditioning system in kalyan csmt air conditioned local off anger among passengers ssb