कल्याण : कल्याण पश्चिमेत गोविंद करसन चौक, शिवाजी चौक ते सहजानंद चौक भागात दररोज सकाळ, सायंकाळच्या दरम्यान अभूतपूर्व वाहतूक कोंडी होते. अशीच परिस्थिती कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात आहे. रेल्वे स्थानक परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामे सुरू आहेत. याठिकाणी रिक्षा चालक वाहनतळ सोडून रस्त्यावर वाहन उभी करून ठेवतात. त्यामुळे प्रवाशांना या भागातून चालणे अवघड होते.

कल्याण पश्चिमेतील या दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे कल्याण शहर परिसरातील नागरिक विशेषता लोकलने प्रवास करणारा नोकरदार वर्ग हैराण आहे. पावसापूर्वीची (अगोट) खरेदी करण्यासाठी मुरबाड, शहापूर, भिवंडी आणि परिसरातील गावखेड्यातून नागरिक घाऊक खरेदीसाठी कल्याणमधील बाजारपेठेत येतात. हे नागरिक आपल्या खासगी वाहनातून, भाड्याचे वाहन करून कल्याणमध्ये येतात. ही वाहने मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर उभी केली जातात. या वाहनांचा स्थानिक वाहनांना अडथळा येतो. सकाळ, संध्याकाळ शहराबाहेरून येणाऱ्या या वाहनांमुळे कल्याण शहर कोंडीने गजबजून जाते.

ही कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांची दमछाक होते. कल्याण, डोंबिवली शहरातील टोईंग वाहने मागील सहा महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे रस्तोरस्ती दुचाकी, चारचाकी वाहने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून उभी केलेली असतात. अनेक दुकानदार वर्दळीच्या रस्त्यावरील आपल्या दुकानासमोर आपले मोटार, दुचाकी वाहन उभे करून ठेवतात. शिवाजी चौक, अत्रे रंगमंदिर ते सुभेदारवाडा शाळा, शिवाजी चौक ते पारनाका भागात हे चित्र दिसते.

कल्याण शहरातील मेट्रो मार्ग उभारणीची कामे बैलबाजारातील गोविंद करसन चौक ते शिवाजी चौक दरम्यान सुरू करण्यात आली आहेत. या मेट्रो मार्गामुळे कल्याण शहरातील हा रस्ता अरूंद झाला आहे. मेट्रोची यंत्रणा रस्त्याच्या मध्यभागी खोदकाम आणि खांब उभारणीची कामे करत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. कल्याण शहरा अंतर्गत धावणारी वाहने या मेट्रो मार्ग सुरू असलेल्या ठिकाणाहून धावतात. याच रस्त्यावरून शिळफाटा, भिवंडीकडून येणारी वाहने शिवाजी चौक मार्गे धावतात. मेट्रो मार्गाच्या अरूंद रस्त्यावर दररोज कोंडी होते. शिवाजी चौक ते करसन चौक दरम्यान एक व्यापारी संकुल आहे. याठिकाणी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची वाहने मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर दोन ते तीन रांगांमध्ये उभी असतात.

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात स्मार्ट सिटी प्रकल्पातून मुरबाड रस्ता ते वलीपीर रस्ता दरम्यान उड्डाण पूल उभारणीची कामे सुरू आहेत. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात बहुतांशी रिक्षा चालक रिक्षा वाहनतळाऐवजी मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर उभे राहून प्रवासी वाहतूक करतात. दीपक हाॅटेल समोरील चौक, पश्चिम रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारात रिक्षा चालक मुख्य प्रवेशदारात रिक्षा उभ्या करून प्रवासी वाहतूक करतात. प्रवाशांना रेल्वे स्थानकात जाणे आणि बाहेर पडण्यासाठी रस्ता राहत नाही. याठिकाणी चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होते. या वाहतूक कोंडीबद्दल कल्याण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र मोहिते यांना संपर्क साधला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही.