बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. आता बारावीनंतर पुढे काय, असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडतोच. ज्यांना चांगले गुण मिळालेत, असे सगळेच विद्यार्थी डॉक्टर, इंजिनीअर होण्याची स्वप्नं पाहत आहेत. त्याची तयारीही अनेकांनी सुरू केली आहे. अर्थात अनेकांचा याच क्षेत्राकडे सर्वाधिक कल असतो; पण गुजरातमधल्या विद्यार्थ्याने बारावीच्या निकालानंतर यापैकी कोणत्याही क्षेत्रात करिअर करायचं नाही, असा निश्चय केला आहे. त्यानं आयुष्य संपूर्णपणे बदलून टाकणारा निर्णय घेतलाय. त्याला संन्यासी व्हायचं आहे. ८ जून रोजी होणाऱ्या दीक्षांत समारंभात तो दीक्षा घेणार आहे. या मुलाचं नाव वर्शील शहा असून बारावीत विज्ञान शाखेतून तो ९९ % मिळवून उत्तीर्ण झाला. इतकं घवघवीत यश मिळवूनही साऱ्या मोह, मायेचा त्याग करून संन्यासी बनण्याचा धाडसी निर्णय त्याने केवळ वयाच्या अठराव्या वर्षी घेतला आहे. त्याच्या या निर्णयाने सगळ्यांनाचा धक्का बसला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : ‘आयएएस’ अधिकारी होण्यासाठी त्याने नाकारली २२ लाखांची नोकरी

गुजरातमधल्या पालदी येथे राहणारे वर्शीलचे वडील आयकर विभागात कार्यरत आहेत. शाळेत असल्यापासूनच वर्शीलचा अध्यात्माकडे ओढा असल्याचे त्याचे वडील जिगर शहा यांनी ‘हिंदुस्थान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. शाळेत असतानाच वर्शीलची जैन मुनी आणि अनेक संन्यासींची भेट झाली. त्यातले अनेक जण आपापल्या क्षेत्रात उच्चपदावर होते; पण त्यांनी देखील संन्यास घेतला. जेव्हा संन्यासी जीवनातच खरं सुख असतं, ही गोष्ट वर्शीलला त्यांच्याकडून समजली, तेव्हापासूनच संन्यासी होण्याचा आपला निर्धार त्याने अधिक पक्का केला. केवळ आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मेहनत करून वर्शीलने ९९ टक्के मिळवले, पण करिअर घडवण्याच्या शर्यतीत रस नसलेल्या वर्शीलने त्यानंतर मात्र वैराग्याचं जीवन जगण्याचा मार्ग अवलंबला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varshil shah scored 99 percentage in class 12th to renounce become a monk