परराज्यातून दररोज शेकडो नागरिक शहरात दाखल

सुहास बिऱ्हाडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई: वसई-विरार दररोज मोठय़ा प्रमाणावर परराज्यातून नागरिक येत असल्याने करोना संसर्गाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. घोडबंदर येथील फाऊंटन हॉटेल नाक्यावर दररोज शेकडो खासगी बसेस येत असतात. या नागरिकांना शहरात आणण्यासाठी महामार्गवर रिक्षा सेवा देखील सुरू झालेल्या आहे.

करोनामुळे टाळेबंदी लागू असली तरी  बांधकाम आणि इतर औद्योगिक क्षेत्रांना पुर्वीपासूनच परवानगी होती. दरम्यान वसई विरार शहरात टाळेबंदीचे निर्बंध शिथील झाले आहेत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर कामगार वर्गाची मागणी वाढू लागली आहे. दुसरीकडे अन्य शहरात असलेली टाळेबंदी आणि बंद झालेला रोजगार यामुळे वसई विरार शहरात कामगार आणि मजूर वर्गाला मोठय़ा प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे परप्रांतीयांचा लोंढा आता वसई विरार शहराकडे येऊ लागला आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर घोडबंदर येथील फाऊंटन हॉटेलसमोर दररोज परराज्यातून खासगी बसेस येत असतात. या बसेसमध्ये परराज्यातील नागरिक शहरात दाखल होतात. त्यांना महामार्गावरून शहरात आणण्यासाठी खास रिक्षा सेवा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे महामार्गावर रिक्षाची वर्दळ दिसून येत आहे.

या नागरिकांची कुठल्याही प्रकारची चाचणी केली जात नसल्याने त्यांच्यापासून शहरात करोना पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधून येणारांची संख्या जास्त आहे. यातील अनेक जण हे आपल्या कुटुंबासह स्थायिक होण्यासाठी वसई विरार शहरात येत आहे. नालासोपारा आणि विरार शहराच्या पुर्वेला मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत असून अतिशय स्वस्तात चाळीमध्ये त्यांना राहण्यासाठी खोल्या मिळत असल्याने ते वसई विरार शहरात येत आहेत. शहर आताच कुठे कोरनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत आहेत. परंतु अशा प्रकारे चाचणी न करता परप्रांतिय येत असतील तर शहरात करोना विस्फोटाचा धोका असल्याची भीती येथील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. किमान या नाक्यावर तपासणी नाके उभारून या नागरिकांची प्रतिजन चाचणी करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

वसईत १२१ नवे रुग्ण; चार जणांचा मृत्यू 

वसईत शहरी भागात गुरुवारी १२१ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १०४ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या ६७ हजार ५२० एवढी झाली आहे. मृतांची आकडेवारी १ हजार ४४४ इतकी झाली आहे. आज दिवसभरात १०४ रुग्ण करोनातून बरे झाल्याने करोनामुक्त रुग्णांची आकडेवारी ६४ हजार ९५३ इतकी झाली आहे. अजूनही १ हजार १२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Third wave threat to vasai virar ssh