अजनी रेल्वे स्थानकाला मिळालेला टर्मिनसचा दर्जा, बैतुल-इटारसी मार्गाने गाठलेली शंभरी, दोन ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूल वाहून गेल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रमाने वाहतूक कमी वेळात सुरळीत करणे, तीन शहरांसाठी सुरू झालेल्या नव्या जलदगती गाडय़ा आणि स्वयंचलित जिने (एस्केलेटर) लागल्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकाला लाभलेले आधुनिक रूप ही मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाची मावळत्या वर्षांतील वैशिष्टय़े राहिली.
अनेक मोठय़ा शहरांमध्ये मुख्य रेल्वेस्थानकावरील ताण कमी करण्यासाठी इतर उपस्थानके विकसित करण्यात येतात. नागपुरात अजनी व इतवारी अशी उपस्थानके असूनही ती विकसित नव्हती. गेल्या वर्षांत अजनी रेल्वेस्थानकाला खऱ्या अर्थाने ‘टर्मिनस’ म्हणून (जेथून गाडय़ा सुटतात आणि तेथे समाप्त होतात) ओळख मिळाली. येथून मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसकरता नवी साप्ताहिक एक्सप्रेस गाडी सुरू झाली, तर अमरावतीसाठी एक्स्प्रेस आणि काझीपेठ पॅसेंजर गाडी येथून सोडण्याची सुरुवात झाली. अजनी रेल्वेस्थानकाचे दर्शनी रूप बदलण्यासोबतच येथे तिसऱ्या फलाटासह प्रवाशांसाठी नवे विश्रामगृह व इतर सोयी करण्यात आल्या.
ब्रिटिशांनी शेकडो मजुरांकडून बांधून घेतलेला डोंगराळ प्रदेशातील अतिशय अवघड वाटणारा बैतुल-इटारसी हा रेल्वेमार्ग आज नागपूर विभागाचे वैशिष्टय़ ठरलेला आहे. या मार्गाला यंदा शंभर वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त टपाल खात्याने काढलेल्या विशेष टपाल तिकिटाचे अनावरण १३ मे रोजी करण्यात आले.
सुरळीत कारभार सुरू असलेल्या रेल्वे विभागासाठी आव्हान ठरतील, अशा दोन घटना यंदा घडल्या. विदर्भ आणि लगतच्या परिसरात यंदा अतिवृष्टी झाली. जोरदार पावसाने १९ जुलैला सिंदी व तुळजापूर स्थानकांदरम्यान ३६० मीटर लांबीच्या पुलाखालचा भराव वाहून गेल्यामुळे मुंबई ते हावडा दरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली. ती सुरळीत होण्यास किमान १५ दिवस लागतील, असे वाटत असताना शेकडो मजुरांनी परिश्रम करून ती आठवडाभरातच पूर्ववत आणली. अशीच घटना २३ ऑगस्टला नागपूर-इटारसी मार्गावरील बरबतपूर व मगरडोह स्थानकांदरम्यान झाली. त्यात माचना नदीच्या प्रवाहामुळे पुलाच्या किनाऱ्याचा भाग वाहून गेला. ही वाहतूक चार दिवसात सुरळीत झाली.
यावर्षी नागपूरहून सिकंदराबादसाठी आठवडय़ातून तीन दिवस चालणारी एक्स्प्रेस सुरू झाली. नागपूर-जयपूर एक्स्प्रेसमुळे अजमेरला जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांची मोठी सोय झाली. अजनी-एलटीटी (कुर्ला) या गाडीच्या रूपात अजनीहून खऱ्या अर्थाने पहिली नवी एक्सप्रेस सुरू झाली.
कुठलेही रेल्वेस्थानक हे त्या-त्या विभागाची शान असते. नागपूर रेल्वेस्थानकावर यंदा दोन्ही बाजूंनी लावण्यात आलेल्या स्वयंचलित जिन्यामुळे (एस्केलेटर) स्थानकाला आधुनिक रूप मिळाले. गाडय़ांच्या आवागमनाची, तसेच आरक्षणाची ताजी स्थिती दर्शवणारे इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डही येथे लावण्यात आले. नागपूरसह विभागातील २० स्थानकांवर रविवारी दुपारी २ ते रात्री ८ या दुसऱ्या पाळीतही आरक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली.
रेल्वेच्या व्यापात वीज मोठय़ा प्रमाणावर खर्च होते. काही उपाययोजना करून विजेच्या खर्चात बचत करण्याची विशेष उल्लेखनीय कामगिरी नागपूर विभागाने केली. त्यासाठी केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने नागपूर विभागाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार दिला.
या सर्व बदलांमध्ये विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश दीक्षित यांचा सिंहाचा वाटा आहे. राजभाषेच्या उपयोसाठी उल्लेखनीय कामाबद्दल त्यांना रेल्वेमंत्री राजभाषा रजत पदकाने सन्मानित करण्यात आले. विभागातील २ अधिकारी व २२ कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक पुरस्कार, तसेच विभागाला महाव्यवस्थापक समग्र दक्षता ढालही मिळाली. याशिवाय, रेल्वे चित्रप्रदर्शन, फिल्म प्रभागाच्या सहकार्याने आयोजित केलेला रेल्वेवरील वृत्तपटांचा महोत्सव आणि अ.भा. आंतर रेल्वे सांस्कृतिक स्पर्धा (संगीत)चे आयोजन ही विभागाची सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरी ठरली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modernization of nagpurrailway station