Assam BJP Disput : आसामध्ये भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं आहे. एका कार्यक्रमात आसाम भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप सैकिया हे सरकारमधील एका मंत्र्यांवर चांगलेच संतापल्याचं समोर आलं आहे. एवढंच नाही तर दिलीप सैकिया हे जेव्हा मंत्र्यांवर संतापले होते, तेव्हा त्या ठिकाणी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे देखील उपस्थित होते. आता या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
आसाम भाजपाचे प्रमुख दिलीप सैकिया, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि मंत्री जयंता मल्ला बरुआ यांच्यासह आणखी काही नेते एका कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. मात्र, या कार्यक्रमात दिलीप सैकिया हे मंत्री जयंता मल्ला बरुआ यांच्यावर संतापल्याचं पाहायला मिळालं. यानंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे त्या ठिकाणाहून निघून गेल्याचं बोललं जात आहे. या प्रकारामुळे आसाम भाजपामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
आसाम भाजपाचे प्रमुख दिलीप सैकिया यांनी या प्रकारानंतर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं की हा पक्षाचा अंतर्गत मुद्दा आहे. मात्र, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासमोरच हा प्रकार घडल्यामुळे काँग्रेसने सत्ताधारी पक्षाची खिल्ली उडवली आहे. सिंडिकेट प्रमुखांना आरएसएसच्या निष्ठावंतांच्या प्रतिक्रियेचा सामना करावा लागत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. दरम्यान, भाजपातील काही सूत्रांनी सांगितलं की, आसाम भाजपाचे प्रमुख दिलीप सैकिया हे मंत्री जयंता मल्ला बरुआ यांच्यावर नारज होते आणि यातूनच ते त्यांच्यावर संतापले होते.
तसेच व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये दिलीप सैकिया हे तेथील स्थानिक नेत्यांवरही ओरडताना दिसत आहेत. मात्र, ते नेमकं काय म्हणत आहेत? हे व्हिडीओतून स्पष्ट समजू शकलेलं नाही. दरम्यान, यावेळी दिलीप सैकिया यांनी तेथील स्थानिक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही पदावरून काढण्याचा इशारा दिल्याचं बोललं जात आहे.
ৰাম ৰাম, পহিলা বহাগতে বিদ্ৰোহ!
— Bhupen kumar Borah (@BhupenKBorah) April 15, 2025
SANGHI RAJ vs SYNDICATE RAJ
I always new that, in BJP Assam, the Syndicate Sardars are facing a fightback from the RSS-loyalists, but unfortunately the Godi Media is too afraid to show it. Therefore, while this shouting match is not a revelation,… pic.twitter.com/GFFEqxmHfs
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटलं की, “सरकारने काल आसामी भाषेवर आधारित एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि सर्व सरकारी सूचना आणि आदेशांसाठी ही भाषा अनिवार्य करण्यात आली. मात्र, माध्यमांसाठी ती महत्त्वाची बातमी नव्हती, फक्त व्हायरल व्हिडीओ महत्त्वाचा होता. त्यामुळे यावरून लोकांची मानसिकता समोर येते. त्यांच्या मनात नकारात्मक गोष्टी असतात आणि मीडिया देखील नकारात्मक गोष्टी शोधतो.”
© IE Online Media Services (P) Ltd