उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यात नव्या सरकार स्थापनेसाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईला रवाना झाले. या पार्श्वभूमीवर बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी गोव्यात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यात त्यांनी शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. तसेच राऊत शिवसेनेत असले तरी ते निम्मं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं करत असल्याचा गंभीर आरोप केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीपक केसरकर म्हणाले, “आता जी युती होत आहे ती महाराष्ट्राच्या जनेतेने निवडून दिलं त्यांची होत आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी पाठीत खंजीर खुपसल्याची भाषा करू नये. पाठीत कुणी खंजीर खुपसला असेल तर तो संजय राऊत यांच्यासारख्या लोकांनी खुपसला. त्यांनी चुकीचा सल्ला दिला. संजय राऊत स्वतः शिवसेनेत आहेत, मात्र निम्म काम राष्ट्रवादीचं करत असतात. त्यावेळी ते जनतेच्या पाठीत खंजीर खुपसत असतात.”

“संजय राऊत केंद्र व राज्यात वाद लावून देत आहेत”

“आज महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे आहे की संजय राऊत यांनी सकाळी ९ वाजता उठून एक पत्रकार परिषद घ्यायची. केंद्रावर टीका करायची आणि केंद्र व राज्यात वाद लावून द्यायचा असं सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राची प्रगती करायची असेल तर केंद्र व राज्य यात चांगले संबंध असावे लागतील. हीच आमची भूमिका आहे,” असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं.

उद्धव ठाकरेंसोबतच्या १६ आमदारांची आमदारकी रद्द होणार का? दीपक केसरकर म्हणाले…

दीपक केसरकर पुढे म्हणाले, “मला विचारण्यात आलं की उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या १६ आमदारांचं काय होईल? त्यावर मी सांगितलं आहे की ज्यावेळी बहुसंख्य आमदार आपला नेता निवडतात त्या नेत्यासोबत त्यांना रहावं लागतं. आम्ही विधीमंडळात आमचा पक्षाची नोंदणी केली तेव्हा आम्ही आमच्या आमदारांच्या स्वाक्षरी दिल्या आहेत. त्यामुळे १६ आमदार आपला निर्णय बदलू शकत नाही. बहुसंख्यांकांनी निवडलेल्या नेत्याचा व्हिप त्या १६ आमदारांना देखील बंधनकारक राहील. आम्ही त्यांना आमच्यासोबत चला असा म्हणणार नाही.”

पाहा व्हिडीओ –

पक्षाची घटना बंधनकारक ही जनतेची दिशाभूल : दीपक केसरकर

“पक्षांतर बंदी कायदा विधीमंडळात काय कृती करता यावर लागू होतो. व्हिपने हजर राहण्यास सांगितलं, मतदान करायला सांगितलं तर तसं करावं लागतं. कायद्यात ‘ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस’ असं स्पष्ट म्हटलं आहे. पक्षाची घटना बंधनकारक आहे अशी जनतेची दिशाभूल केली जात आहे. देशाची घटनाच अंतिम आहे असे न्यायालयाचे अनेक निकाल आहेत. त्याला डावलून इतर कोणतीही घटना काम करू शकत नाही,” असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं.

“कायद्यात काही तरतूद असेल तर त्याला पक्षाची घटना डावलू शकत नाही. कारण पक्षाची घटना पक्ष ठरवतो. विधीमंडळात आपली लिखित घटना चालते. त्यापलिकडे कुणी जाऊ शकत नाही,” असंही दीपक केसरकर यांनी नमूद केलं.

दीपक केसरकर म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही आनंद साजरा केल्याचं बोललं जातंय, मात्र इथं शिवसेना आमदारांमध्ये कुणीही आनंद साजरा केला नाही. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा यासाठी आमचा बंड नव्हता. आमचा बंड आघाडीविरोधात होता. उद्धव ठाकरेंचं मन दुखावं हा हेतू नव्हता. आम्ही आजही शिवसेनेत आहोत. शिवसेनेत ठाकरे कुटुंबाला कोणाचाही विरोध नाही.”

“एकनाथ शिंदे मुंबईला मंत्रीपदाच्या वाटपात खूप मोठा वाटा घ्यायला गेले नाही”

“एकनाथ शिंदे मुंबईला मंत्रीपदाच्या वाटपात खूप मोठा वाटा घ्यायला गेले असं नाही. ते महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी काय करता येईल त्यावर चर्चा करण्यासाठी गेले आहेत. दोन्ही पक्ष मिळून जो निर्णय घेतील त्यात आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असू,” अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.

दीपक केसरकर म्हणाले, “भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांशी बोलून निर्णय घेतील. अद्याप कोणत्याही मंत्र्याची नावं ठरलेली नाही. येथे असलेल्या आमदारांमध्ये चलबिचल करण्यासाठी खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत.”

“एकनाथ शिंदे आनंद शिंदे यांचे मानसपूत्र आहेत आणि त्यांच्याप्रमाणे ते एकवचनी आहेत. त्यांनी एका मोठ्या पक्षाला शब्द दिला होता. त्यामुळे आम्ही हा शब्द फिरवणं शक्य नव्हतं,” असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepak kesarkar allege sanjay raut work for ncp while in shivsena pbs
First published on: 30-06-2022 at 15:30 IST