Rahul Gandhi : संसदेत सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात आज संविधानावर चर्चा झाली. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संविधानावर बोलताना केंद्र सरकारवर विविध मुद्यांवरून जोरदार हल्लाबोल केला. संसदेत बोलताना राहुल गांधींनी म्हटलं की, ज्या प्रकारे द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा मागितला होता अगदी त्या प्रकारे देशातील युवकांचा अंगठा, शेतकऱ्यांचा अंगठा कापण्याचं काम हे सरकार करत आहे. तसेच राहुल गांधींनी संसदेतील भाषणात शेतकरी आंदोलन, अग्निवीर योजना, पेपरफुटीसह हाथरस घटनेच्या मुद्द्यांवरून सरकारवर हल्लाबोल करत सावरकरांनी संविधानापेक्षा मनुस्मृतीला वरचं स्थान दिल्याचं विधान राहुल गांधींनी संसदेत बोलताना केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल गांधी काय म्हणाले?

“संविधान आमचा विचार आहे. मात्र, ‘आरएसएस’ने नेहमी मनस्मृतीची तळी उचलून धरली. आज देशात जे इामानदारीने काम करतात, त्यांचा अंगठा कापण्याचं काम सरकार करतं. देशातील गरीबांचा अंगठा कापण्याचं काम केलं जातंय. आज देशातील तरुण सकाळी ४ वाजता उठून वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करतात. हजारो तरुण दररोज सकाळी उठून ग्राऊंडची तयारी करतात आणि आर्मीमध्ये भर्ती होण्याचं स्वप्न पाहतात. पण केंद्र सरकारने अग्निवीर योजना लागू करून त्या तरुणांचा अंगठा कापण्याचं काम केलं. देशात अनेक ठिकाणी पेपर फुटल्याच्या घटना घडल्या. तब्बल ७० वेळा पेपर फुटल्याच्या घटना समोर आल्या, तेव्हा देखील सरकारने देशातील तरुणांची बोटं कपण्याचं काम केलं”, अशा शब्दांत राहुल गांधींनी केंद्र सरकारला घेरलं.

हेही वाचा : एका हातात संविधान, दुसऱ्या हातात मनुस्मृती आणि राहुल गांधी पुन्हा एकदा सावरकरांवर बोलले…

“दिल्लीच्या बाहेर तुम्ही शेतकऱ्यांना रोखून त्यांच्यावर लाठीचार्ज केला. ते शेतकरी सरकारकडे काय मागतात? तर एमएसपी. त्यांच्या शेती पिकाला योग्य दर मागतात. हे मात्र सरकार अदाणी आणि अंबानींचा फायदा करण्याचं काम करतं आणि शेतकऱ्यांचा अंगठा कापण्याचं काम करतं. संविधानात असं कुठेही लिहिलेलं नाही की पेपर फुटले पाहिजेत. अग्निवीर योजना राबवली जावी असं संविधानात कुठेही नाही”, अशी टीका राहुल गांधींनी केली.

हाथरसच्या घटनेबाबत बोलताना राहुल गांधींनी म्हटलं की, “हाथरस घटनेतील आरोपी बाहेर फिरतात आणि पीडित कुटुंब घरात बंद आहे. त्या पीडित कुटुंबाला त्या मुलीचे अंत्यसंस्कार करु दिले नाहीत. मी हाथरसमधील पीडित कुटुंबाला भेटलो. मात्र, तेथील मुख्यमंत्री त्या घटनेबाबत खोटं बोलले. आता आरोपी त्या कुटुंबाला धमकावतात, कारण उत्तर प्रदेशात संविधान नाही तर मनुस्मृती लागू आहे”, असा आरोप राहुल गांधींनी केला. तसेच पुढे बोलताना राहुल गांधींनी म्हटलं की, “सावरकरांनी देखील संविधानापेक्षा मनुस्मृतीला वरचं स्थान दिलं होतं.” दरम्यान, राहुल गांधी यांच्या टीकेनंतर भाजपाचे नेते अनुराग ठाकूर यांनी जोरदार पलटवार करत राहुल गांधींवर टीका केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi on farmers protest in delhi agniveer scheme changes in parliament winter session pm modi gkt