Team India ICC World cup 2023 Semi Final scenario Marathi News : भारतीय संघाची विश्वचषक स्पर्धा २०२३ मध्ये विजयी घोडदौड सुरू आहे. टीम इडियाने या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या सर्व सहा पैकी सहा सामने जिंकले आहेत. भारतासह गुणतालिकेतील पहिल्या सात संघांचा उपांत्य फेरीचं तिकीट मिळवण्यासाठी संघर्ष सुरू झाला आहे. गुणतालिकेतील शेवटच्या तीन संघांना आता स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागणार आहे. यंदाच्या स्पर्धेत अफगानिस्तान आणि नेदरलँड्स या संघांनी बलाढ्य संघांना पराभवाची धूळ चाखायला लावून क्रिकेटरसिकांना मोठा धक्का दिला आहे. अफगानिस्तानचं या स्पर्धेतलं आव्हान जिवंत आहे.
टीम इंडियाने स्पर्धेत आतापर्यंत सहा पैकी सहा सामने जिंकले आहेत. तरी रोहित शर्मा आणि कंपनीला अद्याप उपांत्य फेरीचं तिकीट मिळालेलं नाही. गुणतालिकेत पहिल्या स्थानी असून, नेट रनरेट उत्तम असूनही भारताला अद्याप उपांत्य फेरीचं तिकीट का मिळालं नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. चला तर मग उपांत्य फेरीचं समीकरण समजून घेऊया.
विश्वचषक स्पर्धेत लिंबू-टिंबू म्हटल्या जाणाऱ्या संघांनी अनेक बलाढ्य संघांना जोरदार दणका दिला आहे. तसेच स्पर्धेत इथून पुढे खेळवले जाणारे सामने उपांत्य फेरीसाठी महत्त्वाचे असणार आहेत. गुणतालिकेतले पहिले सात संघ नॉकआऊट स्थितीत पोहोचले आहेत. उपांत्य फेरीत नेट रनरेटच्या समीकरणाशिवाय आपलं स्थान सुरक्षित करण्यासाठी कुठल्याही संघाला १४ गुणांची आवश्यकता आहे. टीम इंडिया अद्याप १२ गुणांवर आहे. गुणतालिकेची सध्याची परिस्थिती पाहता किमान दोन संघ १२ गुणांसह बाद फेरीत पोहोचणार आहेत. तर दोन संघ १४ किंवा त्याहून अधिक गुणांसह बाद फेरीत दाखल होतील.
उपांत्य फेरीत चार संघ पोहोचणार आहेत. या चार जागांसाठी भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया हे चार संघ प्रबळ दावेदार आहेत. तरी अद्याप अफगानिस्तानचं आव्हान जिवंत आहे. श्रीलंका आणि पाकिस्तानच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा खूपच कमी आहेत. तर इंग्लंड आणि बांगलादेशचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. टीम इंडियाने उर्वरित तीन सामन्यांपैकी एक सामना जिंकला तरी रोहित आणि कंपनीला उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे.