वाई : छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र आणि कार्य संपूर्ण जगासमोर नेण्यासाठी तसेच नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी नवी दिल्ली येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक’ उभे करावे, तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पंतप्रधान कार्यालयात भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक उभारण्याच्या मागणीबरोबर त्यांनी लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर योजनेच्या उद्घाटनासाठी निमंत्रित केले. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर उपस्थित होते.

हेही वाचा – लखनऊ सुपर जायन्ट्स संघात स्थान मिळाल्याने अर्शीन कुलकर्णीवर सोलापूरकर फिदा

छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक हे राज्यशास्त्र, प्रशासन, व्यवस्थापनशास्त्र, वास्तुशास्त्र, कायदा, अर्थशास्त्र, सागरी शास्त्र अशा विविध क्षेत्रांतील संशोधक आणि अभ्यासकांसाठी मैलाचा दगड ठरू शकेल. तसेच महाराजांच्या इतिहासात सुसुत्रता आणण्यासाठी भारतीय पुरातत्व विभाग आणि पुराभिलेखागार विभाग यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे अप्रकाशित दस्तऐवज, पेंटिग्ज, शस्त्रास्त्रे तसेच अन्य कागदपत्रांचे संकलन, संशोधन आणि संपादन करणे आवश्यक असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक ही संकल्पना अतिशय चांगली असून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि त्यांचा इतिहास जगभरात नेण्यासाठी अशा स्मारकांची गरज आहे. हे स्मारक भावी पिढीला प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक विचार करेल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरही खासदार उदयनराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधले. मराठा आरक्षण विषय दिवसेंदिवस फारच गुंतागुंतीचा आणि गंभीर होत चालला आहे. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने लवकरात लवकर विशेष लक्ष घालून हा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर योजनेच्या जलपूजनाला येण्याचे निमंत्रणही मोदींना देण्यात आले.

हेही वाचा – “फेब्रुवारीत आचारसंहिता लागेल तुम्ही त्याचीच वाट….?”, मराठा आरक्षणावरुन पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारला सवाल

केंद्राच्या पंतप्रधान किसान सिंचन योजनेत जिहे-कठापूरचा समावेश करण्याची विनंतीही खासदार उदयनराजे व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मोदींना केली होती. पंतप्रधानांनीही लगेच जलशक्ती मंत्रालयाला आदेश देऊन केंद्राचा निधी देण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यामुळे ही योजना मार्गी लागली. त्यामुळे या योजनेचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्याचा आग्रह खासदार उदयनराजे यांनी केला.

महाराष्ट्रातील आरक्षण परिस्थितीवर यावेळी चर्चा झाली. मराठा सर्व समाजातील समाज घटकांना बरोबर घेऊन जाणार म्हणून ओळखला जाणारा हा समाज आहे. परंतु आता समाजातील मुला मुलींची व कुटुंबांची अर्थिक परिस्थिती भयावह झाली आहे. समाजातील मुला मुलींना शिक्षणासाठी फी भरणे आवघड झाले आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी विनंती केली. तसेच महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी हा समाज अनेक वर्षे झटत आहे. इतर राज्यामध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळाले आहे. परंतु महाराष्ट्रात शब्दांची आदल बदल झाली आहे. महाराष्ट्रात धनगड शब्द नसल्याने आरक्षण मिळत नाही तरी याबाबत आपण लक्ष घालावे व धनगर समाजाला आरक्षण द्यावे ही विनंती केली. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही विषयांवर सकारात्मक विचार केला जाईल व लवकरच तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand for construction of chhatrapati shivaji maharaj national memorial in new delhi udayanaraje meet pm modi ssb