काँग्रेस नेते राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या विधानावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या वक्तव्यावरून महाविकासआघाडीत फूट पडू शकते, असं मोठं वक्तव्य केलं. यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातील जनतेने मोठा प्रतिसाद व प्रेम दिलेले आहे. हे काही लोकांच्या पचनी पडलेले दिसत नाही. राहुल गांधी यांनी एका सभेत बिरसा मुंडा ब्रिटांशासमोर झुकले नाहीत, हे सांगताना त्यांची तुलना सावरकरांशी केली. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची व काँग्रेसची सावरकरांबाबत वेगवेगळी मते आहेत, त्याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही,” असे मत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी व्यक्त केले. ते शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) शेगावमध्ये पत्रकारांशी संवाद करत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जयराम रमेश म्हणाले, “सावरकारांच्या मुद्दयावरून महाराष्ट्रातील काही पक्ष व संघटना नाहक वातावरण तापवत आहेत. सावरकांच्या बाबतीत जे ऐतिहासिक सत्य आहे ते कसे नाकारता? भारत जोडो यात्रेचा हा एकच मुद्दा नाही. यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेसने इतिहासाची मोडतोड करून मांडणी केलेली नाही. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत सावरकर यांनीच मांडला.”

“भारत छोडो चळवळीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध होता”

“१९४२ च्या भारत छोडो, चले जावच्या चळवळीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केला होता. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी हे बंगालच्या फाळणीचे कट्टर समर्थक होते आणि मुस्लीम लिगशी त्यांनी युती करून सरकारही स्थापन केले होते हे ऐतिहासिक सत्य आहे,” असंही जयराम रमेश यांनी सांगितलं.

“काही लोकांकडून विरोध करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न”

जयराम रमेश पुढे म्हणाले, “भारत जोडो यात्रेला प्रचंड समर्थन मिळत असल्याने काही लोक विरोध करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधी यांच्या सुरक्षेची सर्व भारतयात्रींना चिंता आहे, परंतु त्यांच्या सुरक्षेत कसलीही तडजोड केली जाणार नाही,”

हेही वाचा : “राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे आघाडीत फूट पडू शकते”, राऊतांच्या विधानावर काँग्रेसने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “कटू असलं तरी…”

“दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१९ नोव्हेंबर) भारत जोडो यात्रेत ९० टक्के महिलांचा सहभाग असेल. महिलांचं राजकारणातील प्रतिनिधित्व वाढवण्याचा निर्णय इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी घेतला. यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देशभर महिलांचे प्रतिनिधित्व वाढलेले आहे. उद्या नारीशक्तीची भव्य दर्शन भारत जोडो यात्रेत दिसेल,” असंही जयराम रमेश यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jairam ramesh comment on sanjay raut statement about mva over rahul gandhi savarkar pbs