वाई:मराठा आरक्षणावर राज्य शासनाने कोणतेही राजकारण न करता तातडीने श्वेतपत्रिका काढावी. महाराष्ट्रातील प्रत्येक प्रवर्गाला जनगणना झाल्यानंतर त्या संदर्भातील न्याय मिळावा अन्यथा निवडणुका घेऊ नका ,राजकारण थांबवा आणि तातडीने मराठा आरक्षणाच्या संदर्भात ठोस भूमिका जाहीर करा अन्यथा पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही अशी रोखठोक भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात जलमंदिर येथे मांडली.
हेही वाचा >>> सातारा:रस्त्याच्या वादावरून वाईत जोरदार मारामारी, आठ जण गंभीर जखमी
मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या रक्ताने लिहिलेले पत्र खासदार उदयनराजे भोसले यांना देण्यासाठी पंढरपूरचे शहाजी दांडगे व ज्ञानेश्वर गुंड हे दोन मराठा युवक १८० किलोमीटरचा पायी प्रवास करून बुधवारी उदयनराजे यांच्या जलमंदिर येथील निवासस्थानी दाखल झाले .या दोन्ही युवकांची उदयनराजे यांनी आस्थेने चौकशी करून विचारपूस केली. या दोन्ही युवकांनी आरक्षणाच्या संदर्भात त्यांच्या रक्ताने लिहिलेले पत्र उदयनराजे यांना सादर केले. दोन्ही युवकांचे उदयनराजे यांनी कौतुक करून मराठा आरक्षण प्रश्न राज्य शासनाने दुर्लक्ष केल्या प्रकरणी कडक टीका केली.
उदयनराजे पुढे म्हणाले, आरक्षण प्रश्नावर वाद विवाद करण्यापेक्षा विचार करण्याची गरज आहे . प्रत्येक समाजाचा माणूस तुमच्याकडे न्याय देण्याच्या दृष्टीने बघत आहे आणि काही लोकप्रतिनिधी मात्र तुम्हाला बघून घेतो अशी चिथावणीखोर भाषणे करत आहेत . मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य शासनाने श्वेतपत्रिका जाहीर करावी अन्यथा पुढची पिढी राज्यकर्त्यांना माफ करणार नाही, प्रत्येक प्रवर्गाच्या संदर्भात न्याय भूमिका घ्यायला पाहिजे याचे आरक्षण काढून त्याला द्या असे नाही. त्याच्यासाठी जनगणना करा त्या आधारे आरक्षणाची भूमिका जाहीर करा तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असे उदयनराजेंनी सुनावले ?
हेही वाचा >>> “गेल्या काही दिवसांपासून मी डेंग्यूमुळे…”, अजित पवारांनी प्रकृतीबाबत दिली माहिती; म्हणाले, “आजारामुळे अशक्तपणा…”
प्रत्येक जण म्हणतो मला वंचित ठेवले .पण त्यांना वंचित ठेवण्याचा अधिकार दिला कोणी असे रोखठोक विश्लेषण त्यांनी केले. या देशात प्रत्येकाला राहण्याचा अधिकार आहे .आज या युवकांनी रक्ताने पत्र लिहिले आहे .जरांगे पाटील यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे .आरक्षण द्यायचे सोडून त्यावर राजकारण करत कसले बसले आहात .हात जोडून कळकळीची विनंती करतो ,राजकारण करू नका आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी केली.