दैनिक ‘सामना’ला पहिल्या महिला संपादक मिळाल्या आहेत. दैनिक ‘सामना’च्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी सामनाचे संपादकपद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पण उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. सामनाच्या संपादकपदामुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने आता सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे.

सामनामधून शिवसेनेची राजकीय भूमिका, विचार प्रखरपणे मांडले जातात. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. सामनामध्ये लिहिले जाणारे अग्रलेख देशभरात चर्चेचा विषय असतात.  ९० च्या दशकात आपली राजकीय भूमिका, विचार महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामना या दैनिकाची सुरुवात केली. २३ जानेवारी, १९८९ रोजी मध्यरात्री ‘सामना’ दैनिकाची सुरुवात झाली. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात, मोठ्या थाटामाटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते ‘सामना’चे प्रकाशन करण्यात आले.

“हिंदुत्वाचा प्रभावीपणे प्रचार करण्यासाठी आणि दररोज होणाऱ्या आरोपांना उत्तर देण्यासाठी, सामना हे नवे शस्त्र असेल आणि उद्या पाळी आली तर, आम्हाला खऱ्या शस्त्रालाही हात घालावा लागेल” असे प्रकाशनाप्रसंगी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.

‘या असे सामन्याला’ हा सामनाचा पहिला अग्रलेख होता. या अग्रलेखात सामना सुरू करण्यामागची भूमिका स्पष्ट करण्यात आली होती. शिवसेनाप्रमुखांनंतर त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे सामनाचे संपादक झाले. पण आता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. भविष्यात सामनाच्या संपादकपदामुळे अडचणी येण्याची शक्यता असल्याने आता उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे सामनाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashmi thackeray editor of saamana news paper dmp