मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. अशात या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागलं होतं. बीडच्या राष्ट्रवादीच्या आमदाराचं घर जाळण्यात आलं. तर बीडमधल्या राष्ट्रवादी भवनावर तोडफोड आणि दगडफेक झाली. यानंतर आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. आम्ही मराठा आरक्षणासाठी सकारात्मक आहोत मात्र हिंसाचार करणाऱ्यांना सोडणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

आपल्याला कल्पना आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे आंदोलन चाललं आहे त्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मकतेने पाऊल उचलतं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तसं वचन दिलं आहे. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. मात्र याचवेळी काही लोक या आंदोलनाचा फायदा घेऊन हिंसा घडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

शांतता पूर्ण आंदोलन होतं आहे तिथे कारवाई नाही

ज्या प्रकारे बीडमध्ये सोमवारी लोकप्रतिनिधींची घरं जाळणं, विशिष्ट लोकांना टार्गेट कर, प्रतिष्ठानं जाळणं, दवाखाने जाळणं ही कृती काही लोकांनी केली आहे. अशा प्रकारची जी कृती केली आहे ती चुकीची आहे. त्यावर कारवाई होणार आहे. जिथे शांततापूर्ण आंदोलन सुरु आहे तिथे कुठलीही कारवाई केली जाणार नाही. मात्र हिंसेला कुठेही थारा देणार नाही. या संदर्भातल आवश्यकतेप्रमाणे अतरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. जोपर्यंत शांतता प्रस्थापित हो नाही तोपर्यंत पोलीस कारवाई करतील असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

काही पक्षाचे नेते आणि कार्यकर्तेही हिंसाचारात

काही राजकीय पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते देखील या हिंसाचारात सहभागी झाल्याचं दिसतं आहे. त्यासंदर्भातले सगळे पुरावे मिळाल्यानंतर त्याचीही माहिती तुम्हाला दिली जाईल असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. काही लोक जाणीवपूर्वक हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांवर आम्ही कारवाई करणार आहोत. काही लोक फेसबुक किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देत आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.

आज मंत्रिमंडळात अतिवृष्टीमुळे ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांच्यासाठी काही निर्णय घेण्यात आले. दोन हेक्टरचा निकष, तीन हेक्टरपर्यंत वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली आहे त्यांनाही मदत दिली जाणार आहे अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ज्या शेतकऱ्याच्या जमिनीचा भाग खरडून गेला आहे आणि पिकाचं नुकसान झालंय त्याला दोनदा मदत केली जाणार आहे असंही फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Some people and parties spreading violence in the maharashtra behind maratha andolan said devendra fadnavis scj