चंद्रपूर : मुसळधार पाऊस व पुराने शेती पूर्णतः नष्ट झाली. यामुळे चुनाळा येथील शेतकरी रवींद्र नारायण मोंढे (४५) यांनी बुधवार २७ जुलै रोजी राहत्या घरी दुपारी दीड वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार गुरुवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून शेतकऱ्यांच्या अडचणींकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रवींद्र यांच्याकडे सात एकर जमीन आहे. त्यांनी सेवा सहकारी संस्था मर्यादित, चुनाळा येथून शेतीकरिता सत्तर हजार रुपयांचे पीक कर्ज उचल करून शेतात कपाशी व सोयाबीन पिकांची पेरणी केली होती. रवींद्र हा एकुलता एक मुलगा असल्याने घरच्या म्हातारे आई-वडील यांचा सांभाळ वर्षभर शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या भरवशावर करीत होता. मात्र, वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे या एक महिन्यात चार वेळा पुराच्या पाण्याखाली शेतपीक आल्यामुळे त्याचे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले. त्यापूर्वीही दुबार पेरणीच्या संकटाला समोर जावे लागले. अशातच रवींद्र यांच्या आईला विद्युत शॉक लागल्याने त्याही दवाखान्यात उपचार घेत होत्या. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने बँकेचे कर्ज आणि इतरांकडून उसने घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत असलेल्या रवींंद्रने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब शेजारच्या नागरिकांच्या लक्षात येताच राजुरा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता राजुरा येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात आणला. पूरपीडित शेतकऱ्यांना सरकार केव्हा मदतीचा हात देणार आहे, असा सवाल या पूरपीडित गावातील शेतकरी करीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suicide flood affected farmer four times farm flood water ysh