मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जानेवारी ते मार्च २०२४ या कालावधीत एकूण ५६५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यात गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडल्याने तब्बल १३९ प्रवाशांचा बळी गेला आहे. अलीकडेच रिया राजगोर आणि अवधेश दुबे यांचा लोकलमधून पडल्याने मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर हाती आलेली आकडेवारी धक्कादायक आहे.
हेही वाचा >>> सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले पाच जण रिंगणात! एक भाजपकडून, तर मित्रपक्षांकडून प्रत्येकी दोघांना उमेदवारी
मर्यादित लोकल फेऱ्या, वातानुकूलित लोकलमुळे सामान्य लोकलची घटलेली संख्या, वाढती गर्दी, विस्कळीत वेळापत्रक आणि रखडलेले रेल्वे प्रकल्प या दुष्टचक्रात मुंबईकर प्रवासी अडकले आहेत. लोकलमध्ये चढण्यासाठी जिवाची बाजी लावली जाते. त्यातून होणाऱ्या अपघातांत शेकडो प्रवाशांना जीव गमवावा लागला असून अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. कल्याण- आसनगाव-कसारा आणि कल्याण-बदलापूर-कर्जत या मार्गांचा विस्तार, कळवा-ऐरोली उन्नत मार्ग हे प्रकल्प रखडले आहेत. परिणामी लोकल फेऱ्या वाढवणे आणि वक्तशीरपणा राखण्यावर मर्यादा आहेत. त्यामुळे लटकून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे.
मृत्यूचा प्रकार म. रेल्वे प. रेल्वे
रुळ ओलांडताना १६६ १२०
लोकलमधून पडून ९२ ४७
खांबावर धडकल्याने २ ००
विजेचा धक्का लागून १ १
नैसर्गिक ५६ ४८
आत्महत्या १३ ६
इतर ४ ९