गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर अखेर आता गेट वे ऑफ इंडियाजवळ विसर्जनाला मुंबई पोर्ट ट्रस्टने (बीपीटी) परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी देताना बीपीटीने पालिकेला अनेक अटी घातल्या आहेत. जिथे विसर्जन केले जाईल तेथील परिसराची व समुद्राची दररोज साफसफाई करावी, प्रवासी बोटींना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशा अटी घालण्यात आल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेट वे ऑफ इंडिया येथील समुद्रात गणपती विसर्जनास मुंबई पोर्ट ट्रस्टने यावेळी विरोध केला होता. त्यामुळे या परिसरातील मंडळांपुढे गणपती विसर्जन कुठे करायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी हस्तक्षेप केल्यानंतर बीपीटीने तोंडी परवानगी दिली होती. मात्र याबाबत पालिकेच्या विभाग कार्यालयाला कोणत्याही सूचना मिळालेल्या नसल्यामुळे पेच निर्माण झाला होता. मात्र अखेर आता बीपीटीने पत्र लिहून परवानगी दिली असली तरी त्यात अटी घातल्या आहेत.

कुलाबा परिसरातील घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गेट वे ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन करतात. मात्र त्याला मुंबई पोर्ट ट्रस्टने विरोध केला होता. या परिसरात पाण्याची खोली जास्त नसल्यामुळे गणेशमूर्तींचे अवशेष वर येतात व त्यामुळे बोटींचा अपघात होण्याचा धोका असतो. त्यामुळे याठिकाणी १ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या मूर्तींचे विसर्जन करू नये असे पत्र २०१८ मध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टने पालिका विभाग कार्यालयाला दिले होते. त्यानंतर गेली दोन वर्षे टाळेबंदीमुळे मूर्तीच्या उंचीवर मर्यादा होती. त्यामुळे हा विषय मागे पडला होता. यंदा मात्र पुन्हा एकदा या विषयामुळे सार्वजनिक मंडळांपुढे समस्या निर्माण झाली आहे. यंदा उंचीची कोणतीही मर्यादा नसल्यामुळे मंडळांनी मोठ्या मूर्तींसाठीचे नियोजन केले आहे. त्यातच बीपीटीने विसर्जनावर निर्बंध घातल्यामुळे कुलाबा परिसरातील मंडळांना गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीला जावे लागण्याची शक्यता होती. मात्र गिरगाव चौपाटीपर्यंत जाणे शक्य नसल्यामुळे मंडळांनी हा विषय लावून धरला होता. बीपीटीने आता जेट्टी क्रमांक २ वर विसर्जनाला परवानगी दिली आहे. याठिकाणी पाण्याची खोली २ मीटर आहे.

अटी काय आहेत ?
पर्यावरण पूरक मूर्तींचे विसर्जन करावे व त्याकरिता पालिकेने नियमावली तयार करावी.
विसर्जनानंतर पाण्यावर तरंगणारे निर्माल्य, धातू किंवा लाकडाच्या वस्तू , मूर्तीचे अवशेष रोजच्या रोज साफ करावे.
जेट्टीचे कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. जेट्टीचे नुकसान झाल्यास ते दुरुस्त करून द्यावे.
विसर्जनाबाबत पालिकेने बोटींचे व्यवस्थापन करणाऱ्या लाँच ऑपेरेटर आणि बीपीटी प्राधिकरणाला आधी कल्पना द्यावी.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Finally allowed for immersion near gateway of india mumbai print news amy