भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आल्यावर याच ठिकाणी त्यांचे स्मारक करण्याची मागणी पुढे येऊ लागली. त्यावरून वादही निर्माण झाला. भाजपा व काँग्रेसने या मागणीला पाठिंबा दिला असताना भारिप बहुजन महासंघाचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शिवाजी पार्क मैदान हे खेळासाठीच असावे, अशी भूमिका मांडली आहे. आपला या मागणीला विरोध असल्याचं रोकठोक मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. मुंबईत आधीच मुलांना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध नाहीत, अशा वेळी शिवाजी पार्क मैदानात स्मारक उभारणे चुकीेचे ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केलंय.

नक्की वाचा >> शिवाजी पार्कवर लतादीदींचं स्मारक उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र; राऊत म्हणाले, “स्मारक बनवणे सोपे नाही, त्या…”

शिवाजी पार्क येथे लता मंगेशकर यांचं स्मारक उभारण्यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना, “माझा विरोध आहे. शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच राहिलं पाहिजे. त्याला स्मशानभूमीमध्ये कनव्हर्ट करु नये या मताचा मी आहे. बाजूला एक स्मशानभूमी आहे ती चांगलीय मोठीय,” अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुढे बोलताना, प्रकाश आंबेडकर यांनी, “हे एकमेव मैदान आहे जिथं खेळता येतं. इथं शाळा, कॉलेजचे, क्लबचे सामने होतात. व्यक्तींचं स्मारक करायचं असेल तर अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या जागा आहेत. मुलांच्या खेळाच्या मैदानावर अतिक्रमण करावं असं मला वाटत नाही,” असंही म्हटलंय.

नक्की वाचा >> शाहरुख खान लतादीदींचं अंत्यदर्शन घेताना थुंकला की…; जाणून घ्या Viral Photos मागील सत्य

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले होते व तेथेच त्यांचे स्मारक उभारण्यात आले. लता मंगेशकर यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यावर मैदानातच स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार झाले, जेथे त्या पंचत्वात विलीन झाल्या, तेथेच त्यांचे स्मारक उभारावे, अशी करोडो रसिकांची, जनतेची मागणी आहे. हे स्मारक सर्वाना प्रेरणादायी ठरेल, असे राम कदम यांनी म्हटले आहे. कदम यांच्या मागणीनंतर स्मारकावरून चर्चा सुरू झाली.

नक्की वाचा >> लतादीदींच्या अंत्यदर्शनावरुन शाहरुख खानला ट्रोल करणाऱ्यांवर राऊत संतापले; म्हणाले, “हा नालायकपणा…”

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही शिवाजी पार्क मैदानात स्मारक उभारण्याची मागणी केली. लताबाईंच्या स्मारकाला भेट दिल्यावर त्यांचा जादूई, गोड आवाज स्मरणात राहील, पुढील पिढय़ांना प्रेरणा मिळेल, असे भव्य व आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक शिवाजी पार्क येथे उभारावे, असे पटोले यांनी म्हटले आहे.

लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून नाहक राजकारण करू नका, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.   लताबाईंना कधीही विसरता येणार नाही, त्या एक महान व्यक्तिमत्त्व होत्या. त्यांचे स्मारक उभारणे सोपी गोष्ट नाही. त्यांच्या स्मारकाबाबत केंद्र सरकारने किंवा देशाने विचार करण्याची गरज आहे, अशी भूमिका राऊत यांनी मांडली.डली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lata mangeshkar memorial dont make shivaji park cemetery says prakesh ambedkar scsg