नागपूर : आरटीई अंतर्गत राखीव कोट्यातून शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी आरटीईचे समांतर खासगी कार्यालय सीताबर्डीतील आनंद टॉकीजजवळील एका गल्लीत थाटले होते. या खासगी कार्यालयात एक ते दीड लाख रुपये खर्च करून आरटीईचे अर्ज भरणाऱ्या पालकांची नेहमी गर्दी असल्याने लाखोंची उलाढाल होत होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) अंतर्गत मुलांना शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करणाऱ्या १७ पालकांवर सीताबर्डी पोलिसांनी गुन्हे दाखल केले. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली. तपासात अनेक दलालांची नावे समोर येत असून स्वतःला ‘शरीफ’ समजणारा शाहीद नावाचा दलाल आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवून देणाऱ्या टोळीचा म्होरक्या असल्याची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या शाहीदने सीताबर्डीतील आनंद टॉकीजजवळील एका गल्लीत आरटीईचे समांतर कार्यालयाची स्थापना केली. त्या कार्यालयात जवळपास १० ते १२ महिला व पुरुष कर्मचारी ठेवले. आरटीई अंतर्गत ऑनलाईन अर्ज केल्यानंतर शिक्षण विभागातून ती सर्व माहिती शाहीद आपल्या कार्यालयात आणत होता. त्याचे कर्मचारी पैसे देऊ शकणाऱ्या पालकांना फोन करून कार्यालयात कागदपत्र पडताळणीच्या नावाने बोलवत होते. शाहीदच्या कार्यालयात पालकांना नामांकित शाळेत हमखास प्रवेश मिळवून देण्यासाठी ५० हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत रक्कम घेण्यात येत होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. पैसे देणाऱ्या पालकांच्या पाल्यांचा हव्या त्या शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी शाहीद हा शिक्षण विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वापर करीत होता. पालकांकडून घेतलेल्या पैशात त्या शासकीय कर्मचाऱ्यांचाही वाटा तो ठेवत होता. अशाप्रकारे आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी शाहीदने शासकीय कार्यालयाच्या धर्तीवर खासगी कार्यालय थाटल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : सावधान! ‘या’ राज्यांमध्ये बनावट कागदपत्रांवर चोरीच्या वाहनांची नोंदणी, चेसिससह इंजिन क्रमांक…

आरटीई अंतर्गत श्रीमंतांच्या मुलांना प्रवेश

आरटीई अंतर्गत प्रवेश मिळविणाऱ्यांच्या यादीत ६० टक्क्यांपेक्षा जास्त श्रीमंतांच्याच मुलांचा समावेश असतो. अनेक गरीब पालक निराश होऊन आपल्या मुलांसाठी खासगी शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. श्रीमंत पालकांकडून शाहीदसारखे दलाल पैसे उकळून पात्र नसणाऱ्या पाल्यांना प्रवेश मिळवून देतात. त्यामुळे पात्र गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय होत होता.

हेही वाचा : नागपूर विद्यापीठ विद्यार्थ्यांना देणार हिंदू धर्म, संस्कृती, हिंदू साहित्याचे धडे; असा निर्णय का घेतला जाणून घ्या

शहरात पाच ठिकाणी छापे

बनावट कागदपत्राचा वापर करून मुलांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळविणाऱ्या १७ पालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच आरोपी आणि दलाल फरार झाले. त्यामुळे सीताबर्डीचे ठाणेदार आसाराम चोरमोले यांनी शहरात पाच ठिकाणी छापेमारी केली. काही दलालांचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच एसआयटी मार्फत सुरु असलेल्या तपासात शाहीदचे कार्यालयाचासुद्धा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.