नागपूर: रानडुक्कर, हरिण आणि नीलगाय यांना मारुन टाका किंवा आम्हाला त्यांना संपवण्याची परवानगी द्या, अशी मागणी बुधवारी भाजपच्या एका आमदाराने केली. हे प्राणी आमच्या हरभऱ्याच्या लागवडीचे नुकसान करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
उपराजधानीत राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे हरीश पिंपळे यांनी ही मागणी केली. शेतकऱ्यांनी सर्वत्र हरभऱ्याची लागवड केली आहे आणि आता रानडुक्कर, नीलगाय आणि हरिण या पिकांचा नाश करणाऱ्या सर्वात मोठ्या आव्हानाचा सामना करत आहेत. उत्पादकांना आता त्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या शेतात झोपावे लागत आहे.
त्यामुळे वनखात्याने या रानडुक्करांना, हरीणांना आणि नीलगायींना एकतर मारून टाकावे किंवा नष्ट करावे. नाही तर आमच्या पिकांचे रक्षण करण्यासाठी वनखात्याने आम्हाला या प्राण्यांना संपवण्याची परवानगी द्यावी. सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच ही मागणी केल्याने तृणभक्षी प्राण्यांकडून होणाऱ्या पीकनुकसानीचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. राज्यातील मानव-वन्यजीव संघर्षाचा आलेख वाढत आहे. मांसभक्षी प्राण्यांकडून माणसांवर. जनावरांवर होणारे हल्ले, तृणभक्षी प्राण्यांकडून होणारे शेतपिकाचे नुकसान यामुळे जंगलालगतचे गावकरी त्रस्त झाले आहेत. वनखात्याकडून यासाठी नुकसानभरपाई देत असले आणि अलीकडच्या काळात त्यात वाढ करण्यात आली असली तरीही ते पुरेसे नाही. यातून मेलेला माणूस परत येणे शक्य नाही किंवा गेलेले पीक पुन्हा मिळणे शक्य नाही. मानव-वन्यजीव संघर्षावरचा हा तोडगा देखील नाही. समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यात वनखाते अपयशी ठरल्याचेच चित्र आहे.