नागपूर: लोकसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार संपला, आता मतदारांशी थेट दूरध्वनीव्दारे संपर्क साधला जातोय. त्यासाठी मोबाईल फोनचा वापर केला जातो. स्वंयचिलत भ्रमणध्वनी यंत्रणेच्या माध्यमातून मतदारांना फोन जातो. फोन घेतला की ‘ हॅलो.. नमस्कार, मी उमेदवार बोलतो’ असा रेकॉर्डेड संदेश मतदारांना ऐकवला जातो. वारंवार येणाऱ्या या भ्रमणध्वनीमुळे आता मतदार त्रस्त झाले आहेत.

नागपूर जिल्ह्यात लोकसभेचे नागपूर व रामटेक असे दोन मतदारसंघ आहेत. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री व भाजप नेते नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांच्यात लढत आहे. रामटेकमध्ये शिवसेनेचे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे रिंगणात आहे. या उमेदवारांचे रेकॉर्डेड भ्रमणध्वनी मतदारांना येत आहे. ‘ हॅलो.. मी नितीन गडकरी बोलतो , कमळाची बटन दाबा’ , ‘ हॅलो मी…विकास ठाकरे बोलतो, पंजाचे बटन दाबा’, असा संदेश ऐकवला जातो. अनेकदा मतदार कामात व्यस्त असतो, वाहन चालवत असतो. काही तरी महत्वाच्या कामासाठी फोन आला असावा म्हणून तो घेतो तर त्याला वरील संदेश ऐकायला मिळतो व त्याचा मनस्ताप होतो. रोज येणाऱ्या अशा भ्रमणध्वनीमुळे मतदार आता त्रस्त झाले आहे. राजकीय पक्षाचे कार्यकर्तेही फोन करतात. तुमचे मतदान केंद्र, अमुक .. अमुक आहे. मतदानाला या, असे सांगतात.

हेही वाचा…महायुती विरुद्ध आघाडी लढत; पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात पाच लोकसभा मतदारसंघांत उद्या मतदान

फोन बंद केला तर पुन्हा केला जातो. अशाच प्रकारचे व्हॅटॲपवरही संदेश येतात. मतदार यादीत मतदारांचे भ्रमणध्वनी देण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची सोय झाली आहे. पूर्वी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतचिठ्ठ्या पोहचवत होते. आता व्हॅट्सअपमुळे त्यांची सोय झाली आहे. अनेकदा सारख्या नावामुळे इतरांचेही मतचिठ्ठ्या पाठवल्या जातात. एकूणच मतदान नको, पण फोन आवर असे म्हणण्याची वेळ मतदारांवर आली आहे.