नववर्षाच्या स्वागतोत्सवात मद्यपी चालकांकडून वाहन चालविल्यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी नाशिक परिक्षेत्रात मद्यधुंद वाहन चालकांविरोधात धडक कारवाई हाती घेतली आहे. पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी परिक्षेत्रात १६७ ठिकाणी नाकाबंदी करून ४६०९ वाहन चालकांची तपासणी करण्यात आली. त्यात मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या २७७ चालकांवर कारवाई करण्यात आली. शनिवारी रात्री उशिरापर्यंत ग्रामीण भागासह शहरात देखील स्वतंत्रपणे कारवाई सुरू राहणार असल्याने या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- नंदुरबार: बांधकाम मजुरांच्या वाहनाला अपघात; दोन महिलांचा मृत्यू
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जाते. यावेळी आयोजित कार्यक्रमात अनेकांकडून मद्यपान केले जाते. संबंधितांकडून वाहन चालविल्याने अपघाताच्या घटना घडतात. त्यास प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या निर्देशानुसार ३० व ३१ डिसेंबर या कालावधीत विशेष मोहीम सुरू करण्यात आली. त्या अंतर्गत नाशिक ग्रामीण, जळगाव, धुळे, नंदुरबार व अहमदनगर जिल्ह्यात एकूण १६७ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. त्या ठिकाणी पोलिसांकडून एकाच दिवसात ४६०९ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात २७७ चालकांनी मद्यपान केल्याचे निष्पन्न झाले. संबंधितांवर मोटार वाहन कायदयानुसार कारवाई करण्यात आली. तसेच वाहन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ६२५ प्रकरणे करून संबंधितांकडून तीन लाख २७ हजार ५०० रुपयांची दंड वसुली करण्यात आली. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांविरोधात शनिवारी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. त्यामुळे कारवाईच्या आकडेवारीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलाने ३७ ठिकाणी नाकाबंदी केली आहे. ९६० वाहनांची तपासणी केली. ३६ वाहन चालकांवर मद्यपान करून वाहन चालविल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली. मद्यपान केलेले सर्वाधिक ८३ वाहनचालक जळगाव जिल्ह्यात सापडले. नगर जिल्ह्यात ६०, धुळे जिल्ह्यात ५४ व नंदुरबारमध्ये ४४ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई झाली आहे.
हेही वाचा- नाशिक ग्रामीण पोलीस दलासाठी उद्या भरती
जिल्हानिहाय कारवाई
नाशिक ग्रामीणमध्ये ३७ नाकाबंदीच्या ठिकाणी ९६० वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात ३६ मद्यपी वाहनचालकांविरुध्द कारवाई झाली. या शिवाय अन्य नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ७६ प्रकरणात ४९ हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आला. जळगावमध्ये ४९ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. तिथे १४०७ वाहनांची तपासणीअंती ८३ चालक मद्यपान केलेले आढळले. अन्य ४६८ प्रकरणात दोन लाख ३१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धुळे जिल्ह्यात २८ ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली. तिथे ११८२ वाहनांची तपासणी झाली. यावेळी ५४ मद्यपी वाहनचालकांवर तर अन्य ८५ प्रकरणात ४६ हजार ४०० रुपयांची दंड वसुली करण्यात आली. नंदुरबारमधील १८ नाकाबंदीच्या ठिकाणी ४२५ वाहनांची तपासणी झाली. त्यात ४४ मद्यपी चालकांवर कारवाई केली गेली.