-
‘चाहे कोई मुझे जंगली कहे….’ असे म्हणत एकच आरोळी ठोकत बर्फाच्या राशीवरुन खाली घसरत येणारे आभिनेते शम्मी कपूर आजही अनेकांच्या आवडत्या अभिनेत्यांच्या यादीत आहेत.
-
प्रसन्न व्यक्तिमत्त्व, हरहुन्नरी कलाकार आणि तितकाच अतरंगी नृत्य करणारा आभिनेता म्हणून शम्मी कपूर यांची ओळख आहे. एका वेगळ्याच नृत्यशैलीमुळे त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत बरीच प्रसिद्धी मिळवून दिली.
-
‘तुमसा नही देखा’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावी अभिनय आणि चित्रपटाच्या संगीताने अभिनेते शम्मी कपूर यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले. अशा या दिलखुलास अभिनेत्याचा आज स्मृतिदीन आहे.
-
शमशेर राज कपूर असे शम्मी कपूर यांचे संपूर्ण नाव…शम्मी कपूर यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९३१ मुंबईतील अजिंक्य रुग्णालयात झाला. शम्मी कपूर यांच्या जन्माच्या वेळी त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि आई रामशरणी तसेच संपूर्ण कपूर कुटुंब फार चिंतेत होते.
-
शम्मी कपूर यांच्या जन्मापूर्वी राज कपूर यांच्यापेक्षा लहान असलेल्या त्यांच्या दोन भावंडांचे निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या प्रसूतीबाबत घरात खूप अस्वस्थता होती. कपूर यांच्या कुटुंबातील ते एकमेव मुलगा होते ज्यांचा जन्म रुग्णालयात झाला होता.
-
शम्मी कपूर यांना पहाडी गाणी खूप आवडतात. ते शूटींगला जातेवेळी नेहमी हीच गाणी गुणगुणत राहायचे.
-
निळसर डोळे, बोलका अंदाज आणि अनेकांना घायाळ करणारी शम्मीजींची अदा विशेषत: तरुणींमध्ये त्यांना प्रसिद्धी मिळवून देऊन गेली. पण चित्रपटसृष्टीत पदार्पणाच्या काळात शम्मी कपूर यांना यश मिळाले नव्हते.
-
हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये शम्मी कपूर यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी पाहता त्यांना यश मिळणे सहज शक्य होते. पण, स्टारडमचा वापर न करता स्वबळावरच ओळख निर्माण करण्याचा निर्धार शम्मीजींनी केला होता. पण, नशीब काही त्यांना साथ देत नव्हते.
-
अशा वेळी वारंवार त्यांच्या वाट्याला आलेल्या अपयशामुळे शम्मी कपूर यांनी आपल्या कुटुंबासह आसामला जाऊन चहाच्या मळ्यांसाठी मॅनेजरची नोकरी करण्याचा पर्याय निवडला होता. त्याचवेळी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ‘तुमसा नही देखा’ हा चित्रपट बनत होता. या चित्रपटामध्ये नायिकेच्या भूमिकेमध्ये अभिनेत्री अमिता झळकली होती. पण अमिता यांच्यासह काम करण्यासाठी चित्रपटाचे निर्माते एका अभिनेत्याच्या शोधात होते. त्यावेळी शम्मी कपूर फारसे यशस्वी अभिनेते नव्हते, त्यामुळे त्यांना या चित्रपटासाठी विचारण्यात आले.
-
शम्मी कपूर यांच्या जन्मानंतर पृथ्वीराज कपूर हे संपूर्ण कुटुंबाला घेऊन कोलकाताला गेले होते. त्यांचे कुटुंब ७-८ वर्ष तिथेच वास्तव्यास होते. १९३९ मध्ये न्यू थिएटर्स सोडून त्यांचे पिता मुंबईत परतले. १९४४ मध्ये शकुंतला नाटकात शम्मी यांनी भरतची भूमिका साकारली होती. या नाटकामुळे आणि राज कपूर यांच्यामुळे शम्मी यांना अर्धवट शाळा सोडायला लागली होती. शकुंतला नाटकाच्या तालीमसाठी राज कपूर यांना सुट्टी हवी होती. मात्र शाळेच्या मुख्याध्यापिकांनी त्यांना सुट्टी देण्यास मनाई केली. त्यामुळे राज कपूर यांनी संतापून मुख्याध्यापिकांशी भांडण केले. त्यानंतर शम्मी यांनाही अर्धवट शाळा सोडायला लागली होती.
-
त्यानंतर दुसऱ्या शाळेत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी कॉलेजला प्रवेश घेतला. मात्र काही दिवसांनंतर त्यांनी कॉलेजचे शिक्षण अर्धवट सोडले आणि त्यानंतर घरी आल्यावर त्यांनी वडील पृथ्वीराज यांना पपा सॉरी असे म्हटले. यानंतर त्यांना दुसऱ्या दिवसापासून थिएटरमध्ये येण्यास सांगितले.
-
शम्मी कपूर यांनी पदार्पणाच्या काळात नूतनसोबत लैला मजनू हा चित्रपट केला होता. नूतन ही शम्मी कपूर यांची बालपणीची मैत्रीण होती. नूतन 3 वर्षाची आणि शम्मी 6 वर्षाचे असल्यापासून ते एकमेकांचे मित्र होते. तरुण वयात नूतन आणि शम्मी कपूर एकमेकांना डेट करु लागले. शम्मी कपूर यांना नूतनशी लग्न करायचे होते. मात्र नूतन यांची आई शोभनाला हे मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी नूतनला स्वित्झरलँडला पाठवले.
-
शम्मी कपूर यांची लाँचिंग आताच्या स्टार किड्सप्रमाणे झाली नव्हती. शम्मी यांनी ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काही चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून त्यांना दर महिना १५० रुपये मिळत असे.
-
दिग्गज अभिनेत्री गीता बालीसोबत त्यांनी वयाच्या २३ व्या वर्षी लग्न केले होते. शम्मी कपूर आणि गीता बाली कॉफी हाऊस या चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते. त्यानंतर रंगीन राते या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांच्या लग्नाची कथाची रोचक होती. शम्मी रोज गीताला विचारत असे की मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्याशी लग्न करशील का? एक दिवस गीता "चल, लग्न करू," असे शम्मीला म्हणाली. त्यावेळी शम्मीला खूप आनंद झाला.
-
पण त्यावेळी गीता म्हणाली, "पण लग्न आजच करायचे आहे." हे ऐकून त्यांना खूप धक्काच बसला. तो म्हणाला, "हे कसे होऊ शकते?" ती म्हणाली, "का? जॉनी वॉकरने गेल्या आठवड्यात… केले ना… " त्यावेळी शम्मी म्हणाला, “खूप चांगले. चल जाऊया!" मग ते जॉनीकडे गेले, त्यावेळी शम्मी म्हणाला, “आम्ही प्रेमात पडलो आहोत आणि लग्न करायचे आहे, तुझ्यासारखे. मला सांगा, त्यासाठी काय करावे लागेल? " जॉनी म्हणाला, "तुम्ही लोक वेडे आहात! मी मश्चिदमध्ये गेलो आहे, मी मुस्लिम माणूस आहे. तुम्ही लोक मंदिरात जा. तिकडे जाऊन लग्न करा"
-
त्यानंतर ते दोघेही मंदिरात गेले. त्यावेळी पुजाऱ्याने त्यावेळी लग्नाच्या विधी केल्या. त्यांनी दोघांनाही हार घातले. गीताने तिच्या बॅगेतून लिपस्टिक काढली आणि त्याच लिपस्टिकने तिची भांग भरली होती.
-
अभिनेता रणबीर कपूर शम्मू कपूरला आजोबा म्हणून आवाज द्यायचे. त्यावेळी रणबीर कपूरने शम्मीला रॉकस्टारच्या चित्रपटात काम करण्यास सांगितले होते. त्या चित्रपटात शम्मी यांनी ज्येष्ठ शास्त्रीय कलाकार उस्ताद जमील खान यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे नाव शम्मी कपूर यांना समर्पित करण्यात आले होते. कारण त्यांच्या काळात त्यांना संगीत आणि सिनेसृष्टीतील रॉकस्टॉर म्हणून ओळखले जाते. हा चित्रपट २०११ ऑगस्टमध्ये प्रदर्शित झाला होता. तो त्याचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर तीन महिन्यानंतर नोव्हेंबरमध्ये शम्मीने जगाचा निरोप घेतला.
-
वडिल पृथ्वीराज कपूर आणि जेष्ठ बंधू व अभिनेते राज कपूर व चित्रपटसृष्टीतील इतर पट्टीच्या कलाकारंच्या गर्दीतही शम्मी कपूर यांनी त्यांच्या सौंदर्याने आणि दिलखेचक नृत्यशैलीने आजवर अनेकांची मने जिंकली आहेत.
-
हिंदी चित्रपटांमध्ये शर्मिला टागोर, सायरा बानो, आशा पारेख यांसारख्या अभिनेत्रींच्या दमदार पदार्पणासाठीही शम्मी कपूर यांना श्रेय दिले जाते.
-
‘जंगली’, ‘काश्मीर की कली’, ‘अॅन इव्हनिंग इन पॅरीस’, ‘तीसरी मंझील’, ‘ब्रह्म्हचारी’, ’ब्लफ मास्टर’, ’राजकुमार’, ’प्रिन्स’, ’प्रोफेसर’ यांसारख्या चित्रपटांतून भूमिका साकारत शम्मी कपूर नावाच्या या वादळाने बराच काळ सिनेरसिकांवर अधिराज्य गाजवले.
-
’यु तो हमने लाख हसी देखे है’, ’ए गुलबदन’, ’दिवाना हुआ बादल’, गोविंदा आला रे आला’, ’बदन पे सितारे’ यांसारख्या विविध सदाबहार गाण्यांनी भुरळ घालत शम्मी कपूर यांनी रसिकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला आहे.
-
अभिनयासोबतच भारतात स्वत:चे संकेतस्थळ असणाऱ्यांमध्ये शम्मी कपूर यांचे नाव अग्रस्थानी आहे. शम्मी कपूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज अनेक माध्यमांतून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.

भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”