-  
  शहरात शिकायला गेलेल्या लेकराबाळांना पुन्हा गावाकडे आणणारी, सासरी गेलेल्या लेकीला बाळंतपणासाठी माहेरी घेऊन येणारी, शहरात मजुरी करणाऱ्या धन्याला रोजची भाकरी पोहोचवणारी, गावखेड्यातले लोकांच्या छोट्या छोट्या आनंदात सहभागी होणारी, लालपरी…अशा अनेक प्रकारे ओळखली जाणारी जनसामान्यांची एसटी.
 -  
  या एसटीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेची अविरत सेवा देणारे चालक वाहक कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत. त्यांच्या अनेक सहकाऱ्यांच्या आत्महत्येचा जाब सरकारला विचारु पाहत आहेत. त्यांच्या आंदोलनामुळे आज धावणारी लालपरी शांत झाली आहे. त्यानिमित्ताने जाणून घ्या या लालपरीचा इतिहास…
 -  
  एसटीच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, १९२०च्या दशकात अनेक व्यावसायिकांनी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू केल्या होत्या. साहजिकच त्यांच्यामध्ये स्पर्धा होती, प्रवासभाड्यावर नियंत्रण नव्हते.
 -  
  १९३९ साली मोटार वाहन कायदा आला. त्यानंतर या कारभाराला थोडी-फार शिस्त आली. एखाद्या विशिष्ट भागात वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना त्यांची संघटना करण्यास सांगण्यात आले. त्यामुळे पूर्वीपेक्षा प्रवाशांची सोय झाली. कारण वेळापत्रक, निश्चित भाडे, थांबे आदी गोष्टी ठरवण्यात आल्या. वाहकही नेमण्यात आले. हे सगळे १९४८पर्यंत चालले.
 -  
  १९४८मध्ये तत्कालीन मुंबई राज्याच्या सरकारने स्वतःची राज्य परिवहन सेवा सुरू केली. तिचे नाव होते स्टेट ट्रान्स्पोर्ट बॉम्बे. तीच आजची एसटी. एक जून १९४८ रोजी याच सेवेअंतर्गत पुणे ते अहमदनगर या मार्गावर पहिली बस धावली आणि तिकीट होतं केवळ ९ पैसे. ही एसटी तेव्हा निळ्या रंगाची आणि चंदेरी छताची होती.
 -  
  त्या वेळी ड्रायव्हर, कंडक्टर्सना खाकी गणवेश होता आणि टोप्याही होत्या. शेवरोले, फोर्ट, बेडफोर्ड, सेडॉन, स्टडबेकर, मॉरिस कमर्शियल, अल्बियॉन, लेलँड, कोम आणि फियाट अशा १० कंपन्यांच्या बसेस त्या वेळी एसटीमध्ये होत्या.
 -  
  मॉरिस कमर्शियल कंपनीच्या चॅसिसच्या आधारे दोन लक्झरी बसेसही सुरू करण्यात आल्या. त्यांची नावे नीलकमल आणि गिर्यारोहिणी अशी होती आणि त्या बस पुणे ते महाबळेश्वर या मार्गावर धावत. त्या बसमध्ये टू बाय टू सीट्स, पडदे, अंतर्गत सजावट, घड्याळ आदी सोयी होत्या. त्या बसच्या काचा हिरव्या रंगाच्या होत्या.
 -  
  १९५०मध्ये केंद्र सरकारने रस्ते वाहतूक महामंडळ कायदा पारित केला. त्यामुळे राज्य सरकारांना त्यांची स्वत:ची रस्ते वाहतूक महामंडळे स्थापन करण्याचे अधिकार मिळाले आणि त्यात केंद्र सरकारने एक तृतीयांश भांडवली गुंतवणूक केली. त्यामुळे बॉम्बे स्टेट रोड ट्रान्स्पोर्ट कॉर्पोरेशन (बीएसआरटीसी) अस्तित्वात आले. राज्यांच्या फेररचनेनंतर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यानंतर ‘बीएसआरटीसी’चे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) झाले.
 -  
  पुणे-नगर मार्गावर सुरू झालेल्या पहिल्या गाडीचे भाडे केवळ नऊ पैसे होते. पहिल्या बसचे चालक किसन राऊत, तर वाहक लक्ष्मण केवटे हे होते. बेडफोर्ड कंपनीच्या, लाकडी बांधणी असलेल्या तीस गाड्यांनिशी एसटीची सेवा सुरू झाली होती. त्या वेळी काथ्याच्या सीट्स होत्या.
 -  
  एसटी बसच्या रचनेत टप्प्याटप्प्याने बरेच बदल होत गेले. प्रवासी क्षमता ३० आणि ४५वरून वाढून ५४वर पोहोचली. स्टील बांधणीच्या बसेस आणि कुशनच्या सीट्स आल्या. १९६०मध्ये अॅल्युमिनियम बांधणीच्या बसेस आल्या.तसेच, निळी बस आणि चंदेरी छत ही रंगसंगती बदलून आजची लाल परी खऱ्या अर्थाने अस्तित्वात आली.
 -  
  १९५६मध्ये एसटीची सेवा रात्रीच्या काही काळातही द्यायला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर दशकभरात संपूर्ण रात्रभर प्रवास करण्याची सेवाही सुरू झाली. १९८२च्या आशियाई खेळांदरम्यान सेमी-लक्झरी (एशियाड) बसेसची निर्मिती झाली. आता तर अगदी आलिशान अशा शिवनेरी, अश्वमेध, शिवशाही, शिवशाही स्लीपर अशा सेवाही एसटीतर्फे सुरू करण्यात आल्या आहेत.
 -  
  काही वर्षांपूर्वी संगणकीकृत आरक्षण यंत्रणा, तसेच व्हेडिंग मशीनद्वारे तिकीट वितरण आदी सुविधाही सुरू झाल्या आहेत. गेली काही वर्षे महिला वाहक तर आहेतच; पण आता महिला चालकांचीही भरती एसटीमध्ये झाली आहे. प्रशिक्षणानंतर त्या सेवेत रुजू होतील.
 -  
  एसटी केवळ प्रवासी वाहतूकच करत नाही, तर टपाल, औषधे, वृत्तपत्रे आदींचीही वाहतूक करते. तसेच, छोट्या गावांतून मोठ्या शहरांत शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे डबेही एसटीमार्फत पोहोचवले जातात.
 -  
  कोणतेही आंदोलन झाले, की एसटीच्या बसना लक्ष्य करण्याची वाईट प्रथा गेल्या काही काळात रुजली आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. या समस्यांविरोधात सरकारदरबारी न्याय मागण्यासाठी आज त्यांचं आंदोलन सुरू आहे.
 -  
  या आंदोलनातून काय निष्पन्न होणार, त्यांच्या मागण्या मान्य होणार की नाही, संप कधीपर्यंत चालणार, एसटीचं भविष्य काय असे अनेक प्रश्न आत्ता समोर उभे ठाकले असले तरी ‘एसटी वाचली पाहिजे’ ही भावना लालपरीच्या प्रत्येक चाहत्याच्या मनात आहे.
 
  बापरे! पुण्यात आतापर्यंतचं सर्वात मोठं ट्राफिक जाम; नवले ब्रिजचा VIDEO बघून धक्का बसेल, मुंबईकडे येणाऱ्यांची अवस्था पाहा