पुणे : देशात डिजिटल व्यवहारांची लोकप्रियता आणि त्यांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी डिजिटल व्यवहार सोपे आणि सोईचे असल्याचे चित्र सगळीकडे दिसते. असे असले तरी डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. सायबर गुन्हेगारांकडून लाखो नागरिकांना हजारो कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने माहितीच्या अधिकारांतर्गत दिलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील व्यावसायिक प्रफुल्ल सारडा यांनी रिझर्व्ह बँकेकडे याबाबत माहिती अधिकारांगर्तत अर्ज केला होता. ऑनलाईन, डिजिटल आणि डेबिट अथवा क्रेडिट कार्डशी निगडित फसवणुकीच्या प्रकरणांची माहिती त्यांनी मागितली होती. त्यांनी २०१४ पासूनची आकडेवारी रिझर्व्ह बँकेकडे मागितली होती. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आकडेवारीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारकडू डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिले जात असताना फसवणुकीचे प्रकारही अनेक पटींनी वाढले आहेत.

हेही वाचा >>> पुणे: रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर झाला गर्भवती मुलीचा बालविवाह उघड

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०१४ पासून डिसेंबर २०२२ पर्यंत देशात एटीएम अथवा डेबिट कार्डशी निगडित फसवणुकीच्या १ लाख ४० हजार ७३६ घटना घडल्या असून, ५०७.१२ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. याच कालावधीत क्रेडिट कार्डशी निगडित प्रकरणांमध्ये १ लाख ३७ हजार २३७ जणांची ५१४.९० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. इंटरनेट बँकिंगशी निगडित प्रकरणांमध्ये ६१ हजार ५६१ जणांची ३५४.७८ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.

एटीएम अथवा डेबिट कार्डशी निगडित फसवणूक होण्याच्या केवळ ७१ घटना २०१४-१५ घडल्या होत्या. त्यात २०१९-२० मध्ये वाढ होऊन त्या ३६ हजार ९७८ वर पोहोचल्या. याचबरोबर फसवणुकीची रक्कमही १.५१ कोटी रुपयांवरून १०२.१३ कोटी रुपयांवर गेली. आता ही संख्या कमी होताना दिसत आहे. एटीएम अथवा डेबिट कार्डशी निगडित फसवणुकीच्या घटना २०२२-२०२३ मध्ये ७ हजार ३९५ वर घसरल्या असून, फसवणुकीचा आकडा २९.२१ कोटी रूपयांवर आला आहे.

हेही वाचा >>> पुणे: मालमत्तेच्या व्यवहारातील दलालीच्या वादातून कोंढव्यात एकावर खुनी हल्ला

याबाबत बोलताना प्रफुल्ल सारडा म्हणाले की, सरकारने चांगल्या हेतूने डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिले. परंतु, याबद्दल जनतेला पुरेशे ज्ञान नाही. त्यांनी डिजिटल व्यवहार करताना अॅप्लिकेशनच्या सुरक्षिततेविषयी माहिती नसते. यामुळे ते सहजासहजी जाळ्यात सापडत आहे. अशा प्रकारे दोन हजार कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक आणि सायबर गुन्हे शाखेने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. बँका आणि डिजिटल पेमेंट अॅप्लिकेशननी रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे काटेकोर पालन करून सामान्य जनतेचा पैसा सुरक्षित करावा.

व्यवहार करतानाही धोका

डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि यूपीआयच्या माध्यमातून डिजिटल व्यवहार करताना २०२०-२०२१ मध्ये ४ लाख ४९ हजार ६८४ जणांची ६३६.१२ कोटी रूपयांची फसवणूक झाली आहे. याचप्रकारे २०२१-२०२२ मध्ये ३ लाख ५९ हजार ७९१ जणांची ८१६.४० कोटी रुपयांची फसवणूक झालीय एप्रिल ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत १ लाख ४८ हजार ८८७ जणांची ४१८.३१ कोटी रुपयांची फसवणूक झाली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyber criminals digital transactions pune print news stj 05 ysh
First published on: 21-03-2023 at 15:31 IST